Virat Kohli post for Anushka Sharma: ई साला कप नाम दू! १८ वर्षांच्या तपश्चर्येनंतर अखेर क्रिकेटचा किंग विराट कोहलीने (Virat Kohli) आयपीएल (IPL 25) ट्रॉफी नावावर केली. काल अहमदाबाद येथे झालेल्या आयपीएल फायनलमध्ये बंगळुरु संघाने पंजाबचा पराभव केला आणि पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकली. ज्या क्षणी बंगळुरु मॅच जिंकले त्याचक्षणी मैदानात विराटच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्याला पाहून सर्वच चाहत्यांचे डोळे पाणावले. विराटच्या प्रत्येक प्रसंगी त्याच्यासोबत त्याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) होती. मॅचनंतरचे अनेक क्षण कॅमेऱ्यात कैद झाले. यामध्ये विराट - अनुष्काची मिठी, ते प्रेमळ क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता नुकतंच विराटने अनुष्कासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) १८ वर्षांनंतर आयपीएल ट्रॉफी जिंकल्याने बंगळुरुतील लोक जास्त खूश आहेत. विराटचं बंगळुरुमध्ये आज जंगी स्वागत झालं. त्याची विजयी रॅली काढण्यात आली. यानंतर आता विराटने अनुष्कासोबतचा गोड फोटो शेअर करत लिहिले, "मी हे स्वप्न १८ वर्षांपासून पाहिलं आहे आणि अनुष्काने ११ वर्षांपासून पाहिलं आहे. २०१४ पासून आम्ही दोघांनी सारखेच क्षण अनुभवले. अनेकदा विजयाच्या जवळही पोहोचलो होतो. चिन्नस्वामीवर आलेल्या आमच्या सर्व चाहत्यांसोबत आनंद साजरा केला. आम्ही दोघंही आज समाधानी आहोत आणि अनुष्का बंगळुरुची मुलगी असल्याने तिच्यासाठी हे खूपच खास आहे. प्रत्येक काळात आम्ही एकमेकांसोबत राहिलो आणि आहोत."
विराट-अनुष्का या जोडीने एक वेगळीच जादू केली आहे. पती-पत्नी म्हणून त्यांचा असलेला बाँड पाहून चाहतेच काय अनेक कलाकारही त्यांच्यावर फिदा आहेत. जोडी असावी तर अशी अशीच अनेकांची प्रतिक्रिया असते. अनुष्कामुळे विराटमध्ये झालेला बदल सर्वांनीच पाहिला आहे. याचंच आज त्यांना फळ मिळालं आहे. अखेर आयपीएल ट्रॉफी मिळवत विराटची स्वप्नपूर्ती झाली आहे.