अभिनेत्री करिश्मा कपूरचे (Karishma Kapoor) घटस्फोटीत पती आणि उद्योजक संजय कपूर (Sunjay Kapur Death) यांचं वयाच्या 53 व्या वर्षी निधन झालं. संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माचं वैयक्तिक आयुष्य पुन्हा चर्चेत आलं आहे. संजय कपूरशी लग्न करण्याआधी करिश्मा ही अभिषेक बच्चनसोबत (Abhishek Bachchan) रिलेशनशिपमध्ये होती. दोघांचा साखरपुडा झाला होता आणि चित्रपटसृष्टीतील दोन मोठ्या कुटुंबांचा हा सोहळा सगळ्यांच्या उत्सुकतेचा विषय ठरला होता. पण, लग्नाच्या काही महिन्यांपूर्वीच हे नातं तुटलं. नेमकं का? यामागची कारणं अजूनही गुलदस्त्यात आहेत. याबद्दल अनेक अंदाज लावले गेले आहेत.
अभिषेक व करिश्मा हे एकमेंकाच्या प्रेमात होते. ५ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. कपूर आणि बच्चन कुटुंब जवळ असल्यानं त्यांच्या लग्नाला सहमतीही मिळाली होती. करिश्मा व अभिषेकच्या लग्नाची घोषणा खुद्द जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन यांच्या ६० व्या वाढदिवशी केली होती. मोठ्या आनंदात साखरपुडाही झाला होता. पण, साखरपुड्यानंतर काही महिन्यांमध्येच करिश्मा व अभिषेकमध्ये दुरावा आला आणि दोघांचं ब्रेकअप झालं.
करिश्मा व अभिषेकचं नातं तुटण्यामागे माध्यमांमध्ये अनेक कारणांची चर्चा झाली होती. लग्नानंतर करिश्माने चित्रपटांमध्ये काम करू नये, अशी बच्चन कुटुंबाची इच्छा होती, म्हणून लग्न मोडल्याचं बोललं गेलं. यासोबतच अशीही अफवा होती की करिश्माची आई बबिता कपूर यांच्यामुळे या दोघांचं ब्रेकअप झालं. बबिता कपूर यांनी बच्चन कुटुंबियांपुढे काही अटी ठेवल्या. त्यामधील एक अट म्हणजे बच्चन कुटुंबाने लग्नाआधी संपत्तीचा काही भाग अभिषेक याच्या नावावर करायचा. बच्चन कुटुंबीयांनी मात्र बबिता यांच्या अटीवर आक्षेप घेतला आणि लग्न मोडलं असं देखील म्हटलं जात.
करिश्मा व अभिषेक यांनी नातं तुटल्याची नेमकी कारणं कधीच स्पष्टपणे सांगितली नाहीत. अभिषेकसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अगदी काही महिन्यांनी करिश्मानं दिल्लीतील उद्योगपती संजय कपूरशी लग्न केलं होतं, जे काही वर्षांनी घटस्फोटात संपलं. तर अभिषेकनं पुढे २००७ मध्ये ऐश्वर्या रायशी लग्न केलं होतं.