‘नीरजा’च्या आठवणीने भावूक झाली सोनम कपूर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2017 16:35 IST
‘नीरजा’ला एक वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने सोनमने एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्यातून ‘नीरजा’ने तिच्या आयुष्यावर किती खोलपर्यंत प्रभाव टाकला हेच दिसले.
‘नीरजा’च्या आठवणीने भावूक झाली सोनम कपूर!
‘नीरजा’ या चित्रपटाने प्रेक्षक आणि समीक्षक दोघांचीही शाब्बासकी मिळवली. ‘नीरजा’ची व्यक्तिरेखा साकारणा-या सोनम कपूरसाठी यापेक्षा मोठी गोष्ट कुठली असू शकते. या चित्रपटाने सोनमला आतूर-बाहेरून पुरते बदलून टाकले. या चित्रपटानंतर व्यावसायिक स्तरावर सोनम बदललीच. पण या चित्रपटाने सोमनच्या खासगी आयुष्यावर बराच मोठा प्रभाव टाकला. सोनमने अनेक मुलाखतीत हे कबुल केले आहे. सोनमची ही कबुली केवळ बोलण्यापुरतीच नव्हती तर तिच्या या बोलण्यात प्रामाणिकपणा होता, हे आता स्पष्ट झालेय. होय, ‘नीरजा’ला एक वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने सोनमने एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्यातून ‘नीरजा’ने तिच्या आयुष्यावर किती खोलपर्यंत प्रभाव टाकला हेच दिसले. या पोस्टसोबत सोनमने ‘नीरजा’चे पोस्टरही शेअर केले आहे . या पोस्टमध्ये ती लिहिते, प्रत्येकाच्या मनात भीती घर करून असते. माझ्या मनातही काही गोष्टींबद्दल भीती होती. पण ‘नीरजा’ने मला ही भीती कशी ओळखायची ते शिकवले. केवळ एवढेच नाही तर या भीतीवर मात कशी करायची, हेही ‘नीरजा’नंतर मी शिकले. या चित्रपटाने माझे आयुष्य बदलले. ‘आनंद’ या चित्रपटात राजेश खन्ना म्हणतात, त्याप्रमाणे,‘जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिए’. मला आशा आहे, माझे आयुष्यही असेच अर्थपूर्ण ठरेल. भीतीवर विजय मिळवण्यासोबतच माझ्या वाट्याला जे काही आले, त्यात आनंद व समाधान मानायला मी शिकेल. मला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल मी कृतज्ञ आहे.‘नीरजा’ ही नीरजा भानोट हिच्या आयुष्यावर बेतलेली सत्यकथा आहे. राम माधवानी दिग्दर्शित या चित्रपटात सोनम कपूरसोबत शबाना आझमी, शेचर रविजानी आदींच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.