Join us  

गेल्या २७ वर्षांत बादशाहची संपत्ती ४ अब्जांपेक्षा अधिक, इतक्या ठिकाणी त्याने केलीय गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2020 3:45 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोरोनाविरोधात लढण्यासाठी उभारलेल्या PM CARE फंडालाही मोठी मदत देऊ केली आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या कलाकारांचं जगणं, जीवनशैली आलिशान असते हे साऱ्यांना माहिती आहे.  सेलिब्रिटी मंडळींवर रसिक जीव ओवाळून टाकतात. रसिकांचं या सेलिब्रिटींवर मनापासून प्रेम असतं. रसिकांच्या या प्रेमामुळेच सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या करिअरमध्ये कोट्यवधींची कमाई करतात. दर महिन्याला सेलिब्रिटी गलेलठ्ठ कमाई करतात. करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असताना होणा-या कमाईचा आकडा पाहून अनेकांना धक्काही बसतो. आपल्या अभिनयाने शाहरुखने रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलं आहे.

 

करिअरच्या २७ वर्षांत शाहरुखने  ‘डर’, ‘बाजीगर’, ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे’, ‘दिल तो पागल है’, ‘कुछ कुछ होता है’, ‘देवदास’, ‘चक दे इंडिया’ अशा विविध चित्रपटात एकाहून एक सरस भूमिका साकारल्या आहेत. या भूमिकांमुळेच रसिकांनी त्याला बादशाह आणि किंग अशी उपाधी दिली. हाच किंग संपत्तीबाबतही खराखुरा किंग असल्याचं समोर आलं आहे. 

एका इंग्रजी वेबवसाईटनुसार २०१९ या वर्षात शाहरुखची एकूण संपत्ती सुमारे ४१ अब्ज ६३ कोटी रुपयांच्या घरात आहे. शाहरुख वांद्रे इथल्या ज्या बंगल्यात राहतो त्या आलिशान मन्नत बंगल्याची किंमत जवळपास २०० कोटींच्या घरात आहे. दुबईमध्ये शाहरुखचा ‘व्हिला के ९३’ हा बंगला आहे तर लंडनमधील पार्क लेन इथंसुद्धा त्याचं घर आहे. ही संपत्ती जवळपास १६७ कोटी रुपयांची आहे. 

शाहरुखकडे बऱ्याच महागड्या आणि आलिशान गाड्या आहेत. यांत ‘ऑडी A6’, ‘बीएमडब्ल्यू i8’, ‘बीएमडब्ल्यू 7 सीरिज’, ‘हार्ले डेव्हिडसन डायना स्ट्रीट बॉब’ ‘बेंटली कॉन्टिनेंटल जीटी’ अशा गाड्यांचा समावेश आहे. आयपीएलच्या केकेआर संघाचा सहमालक आहे. त्याच्याकडे या संघाच्या मालकीचे ५५ टक्के शेअर असून त्याची किंमत जवळपास ५७५ कोटी इतकी आहे. शाहरुखची रेड चिलीज ही कंपनी असून त्याची वार्षिक उलाढाल ५०० कोटींच्या घरात आहे.

त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोरोनाविरोधात लढण्यासाठी उभारलेल्या PM CARE फंडालाही मोठी मदत देऊ केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले प्रयत्न करत आहेत. त्यांच्या कोरोनाविरोधातील लढाईला आम्ही छोटी मदत करत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल आणि अन्य राज्यांचे नेते या महामारीविरोधात लढा देत आहेत. तो कौतुकास्पद आहे. आम्ही मुंबई, कोलकाता आणि नवी दिल्ली या तीन शहरांवर सुरुवातीला लक्ष केंद्रीत केले आहे. मी आणि माझी टीम यथायोग्य मदत करत आहोत, असे शाहरूख खानने म्हटले आहे. याच बरोबर पुढे येणाऱ्या संकटांना खंबीरपणे तोंड देण्याची ताकद ठेवण्याचे आवाहनही शाहरूख खानने केले आहे.

टॅग्स :शाहरुख खान