Join us

​ऋषी कपूरचे दाऊदसोबत चहापान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2017 20:48 IST

अभिनेता ऋषी कपूरने आत्मचरित्र 'खुल्लम खुल्ला ऋषी कपूर अन्सेन्सर्ड' मध्ये आपल्या जीवनातील अनेक मनोरंजक पैलूंवर भाष्य केलं आहे.  अंडरवर्ल्ड ...

अभिनेता ऋषी कपूरने आत्मचरित्र 'खुल्लम खुल्ला ऋषी कपूर अन्सेन्सर्ड' मध्ये आपल्या जीवनातील अनेक मनोरंजक पैलूंवर भाष्य केलं आहे.  अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमसोबत झालेल्या भेटीबाबत त्यांनी यामध्ये उल्लेख केला आहे. 1988 मध्ये दुबईत एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले असताना  ऋषी कपूर यांची दाऊदशी भेट झाली. यावेळी दोघांमध्ये तब्बल चार तास चर्चा झाली.  '' प्रसिद्धीमुळे मला आयुष्यात चांगल्या लोकांसोबतच संदिग्ध लोकांशीही  भेटता आलं. यापैकी एक होता दाऊद इब्राहीम. 1988 साली मी माझा जवळचा मित्र बिट्टू आनंदसोबत आशा भोसले आणि आर.डी. बर्मन यांच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दुबईला गेलो होतो. विमानतळावर एक अनोळखी व्यक्ती माझ्याकडे आला. माझ्या कडे फोन देऊन दाऊद साब बात करेंगे असं तो म्हणाला. 1993 स्फोटांच्या पुर्वीची ही घटना असल्याने मी त्यावेळी दाऊदला पळकुटा समजत नव्हतो. त्यावेळी तो महाराष्ट्रातील लोकांचा शत्रूही नव्हता. मला तरी असं वाटायचं. दाऊदने माझं स्वागत केलं आणि कोणत्याही गोष्टीची गरज असेल तर मला सांग असं बोलून त्याने मला घरी येण्याचं निमंत्रण दिलं. मी या प्रकाराने आश्चर्यचकित होतो. ''     त्यानंतर ब्रिटिशांप्रमाणे दिसणा-या एका गो-या, लट्ठ मुलाशी माझी भेट घडवण्यात आली. तो दाऊदचा राइट हॅंड बाबा होता. 'दाऊद साब आपके साथ चाय पीना चाहते हैं' असं तो म्हणाला. मला यामध्ये काही चुकीचं वाटलं नाही आणि मी निमंत्रण स्वीकारलं. त्या संध्याकाळी मला आणि बिट्टूला आमच्या हॉटेलमधून अलिशान रोल्स रॉयसमधून नेण्यात आलं. आमची कार वर्तुळाकार रस्त्याने जात असल्याचं मला लक्षात आलं त्यामुळे त्याच्या घराचं  नेमका पत्ता मला सांगता येणार नाही. दाऊद पांढ-या रंगाच्या इटालियन ड्रेसमध्ये आला आणि उत्साहात  त्याने आमचं स्वागत केलं. मी दारू पीत नसल्याने तुम्हाला चहा पिण्यासाठी बोलावलं असं  माफी मागण्याच्या शैलित दाऊद म्हणाला. त्यानंतर जवळपास 4 तास आमचं चहा-बिस्कीटचं सत्र सुरू होतं. त्याने अनेक विषयांवर चर्चा केली. स्वतः केलेले अपराधही त्याने सांगितले मात्र त्यासाठी त्याला कोणताही पश्चाताप वाटत नव्हता.    ''मी लहान-मोठ्या  चो-या केल्यात पण कधी कोणाला जीवानिशी मारलं नाही. हो, पण दुस-यांकरवी जरूर हत्या घडवली आहे. खोटं बोलला म्हणून मुंबईत मी एकाची हत्या घडवून आणली,'' असं दाऊद म्हणाला. दाऊदने असं का केलं यावर त्याचं उत्तर मला नक्की आठवत नाही. मात्र, ''तो व्यक्ती अल्लाच्या आदेशाविरोधात वागला म्हणून आम्ही पहिले त्याच्या  जीभेवर गोळी मारली नंतर त्याच्या  डोक्यात''असं तो म्हणला.  दिग्दर्शक राहुल रवैल यांनी 1985 मध्ये आलेल्या अर्जुन या सिनेमात कोर्टरूम मर्डरचा सीन यावरूनच घेतला होता.      माझा  'तवायफ' हा सिनेमा दाऊदला जास्त आवडला कारण यामध्ये  माझं नाव दाऊद होतं. माझे वडिल आणि काका आवडत असल्याचं दाऊदने मला सांगितलं. दिलिप कुमार, मुकरी आणि महमूद यांचंही त्याने कौतूक केलं. दाऊदच्या घरी जाताना मी फार घाबरलो होतो मात्र, संध्याकाळपर्यंत भीती जरा दूर झाली होती. चार तासात आम्ही अनेकदा चहा पिलो. ''मला कोणत्या गोष्टीची गरज तर नाही ना? असं त्याने मला पुन्हा विचारलं. तुम्हाला कितीही पैशांची गरज असेल तर तुम्ही मला सांगू शकतात असं त्याचं वाक्य होतं. त्याचे आभार मानून आमच्याकडे सर्वकाही असल्याचं मी त्याला म्हणालो.   त्यानंतर  मी दाऊदला एकदाच भेटलो तेही दुबईत. मला बूट खरेदी  करायला आवडतात. एकदा मी आणि नितू एका रेड-शू कंपनी नावाच्या एका दुकानात खरेदीसाठी गेलो होतो. दाऊदही तिथेच होता. त्याच्या हातात मोबाईल होता आणि 8 ते 10 सुरक्षारक्षकांचा त्याला गराडा होता. ''तुम्हाला काय हवं ते मी विकत घेतो'' असं तो म्हणाला. माझी खरेदी मीच करेल असं मी दाऊदला म्हणालो. त्याने मला त्याचा मोबाईल नंबर दिला मात्र ही 1989ची घटना असल्याने माझ्याकडे मोबाईल नव्हता .    ''भारतात मला न्याय मिळणार नाही म्हणून मी भारतातून पळालो. भारतात अनेक लोक माझ्या विरोधात आहेत. मी विकत घेतलेले लोकंही तेथे आहेत. मी अनेक नेत्यांनाही खिशात घेऊन फिरतो आणि त्यांना पैसे पाठवतो'' असं तो शेवटी म्हणला. कृपया या सर्वांपासून मला दूर ठेव, मी एक अभिनेता आहे, मला यामध्ये पडायचं नाही असं मी त्याला म्हणालो. त्यानंतर कधी पुन्हा दाऊद भेटला नाही.  दाऊदच्या कुटुंबातील काही जणांसोबत माझी अनेकदा भेट झाली. श्रीमान आशिक या माझ्या सिनेमातील गाणी दाऊदचा भाऊ नूरा याने लिहिली होती.