गोविंदा हा बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता. गोविंदाला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. गोविंदा यशाच्या शिखरावर असताना त्याला अचानक काम मिळेनासं झालं. काही वर्षांपूर्वी आलेल्या 'पार्टनर' सिनेमातून गोविंदाने कमबॅक करण्याचा प्रयत्न केला परंतु तरीही गोविंदाचं करिअर रुळावर आलं नाही. गोविंदाच्या करिअरमध्ये इतका ब्रेक कसा लागला. काय होतं यामागचं कारण? याविषयी सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि निर्माते पहलाज निहलानींनी खुलासा केला आहे.
विक्की लालवानीच्या पॉडकास्टमध्ये पहलाज यांनी गोविंदाच्या करिअरचा ग्राफ खाली कसा आला, याविषयी सांगितलं आहे. पहलाज म्हणाले, "गोविंदा एक ऑलराऊंडर अभिनेता होता. गोविंदाने त्याच्या करिअरला खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलं. परंतु तो लोकांवर पटकन विश्वास ठेवायचा. त्याच्या आसपास वातावरण चांगलं नव्हतं त्यामुळे गोविंदा भरकटायचा. गोविंदासोबत ज्योतिषी किंवा भविष्य सांगणारी लोक असायची. त्यामुळे गोविंदाच्या वागण्या बोलण्यातही फरक पडायला लागला. फिल्मी जगतात कोणी माणूस विचित्र बोलत असेल, तर लोक त्याला गांभीर्याने घेत नाहीत."
"गोविंदा इतका भोळा होता की, पार्टनरमध्ये डेव्हिड धवनची इच्छा होती की गोविंदाने त्यातली भास्करची भूमिका करावी. परंतु सलमान आणि डेव्हिडने मिळून गोविंदाच्या करिअरच्या बुडत्या नावेला आधार दिला, असं बोललं जाऊ लागलं. गोविंदाला याच गोष्टीचा राग आला. त्यामुळे २००७ ला रिलीज झालेल्या पार्टनरनंतर डेव्हिड धवन आणि गोविंदाच्या नात्यात दुरावा आला. पार्टनर हा शेवटचा सिनेमा होता, ज्यात दोघांनी एकत्र काम केलं होतं." अशाप्रकारे पहलाज निहलांनीनी गोविंदाविषयी खुलासा केला. गोविंदा सध्या कोणत्याही नवीन प्रोजेक्टमध्ये दिसत नाही. तरीही गोविंदाच्या चाहत्यांना अभिनेत्याच्या नवीन प्रोजेक्टची आतुरता आहे.