Ahmedabad Air Plane Crash: गुजरातमधील अहमदाबाद येथे १२ जूनला एअर इंडिया विमानाचा मोठा अपघात झाला. दिल्लीहून सुटलेलं लंडनला जाणारं एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर एआय-१७१ हे विमान अहमदाबाद एअरपोर्टवरुन उड्डाण घेताच काही क्षणातच कोसळले आणि मोठा स्फोट झाला. या विमानात २४२ प्रवासी होते. या घटनेनंतर संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त केली जात आहे. एअर इंडियाच्या विमान अपघात घटनेनंतर बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिने विमानाने प्रवास केला आहे.
रवीना टंडन हिने एअर इंडिया विमानाच्या प्रवासाचा अनुभव शेअर केला आहे. अपघातानंतर विमानात काय परिस्थिती होती, हे तिने पोस्टमधून सांगितलं आहे. ती म्हणते, "नवीन सुरुवात...परिस्थिती विरोधात असताना पुन्हा उडण्याचं आणि मोठं व्हायचं... पुन्हा नवीन सुरुवात करायची. अधिक सक्षम होण्यासाठी नवीन संकल्प करायचे. वातावरण गंभीर होते आणि क्रू मेंबर्स दु:खाची लकेर असलेल्या हसऱ्या चेहऱ्याने स्वागत करत होते. शांत प्रवासी आणि क्रू यांच्यातील अव्यक्त शोकभावना. पण तरीही त्यांच्यातील आत्मविश्वासाने ते जोडले आहेत. ज्यांनी प्रियजन गमावलेले त्या सगळ्या कुटुंबीयांप्रती शोकभावना आहेत. ही जखम कधीच भरुन न निघणारी आहे. एअर इंडिया निर्भय(घाबरत नाही) आहे. त्यामुळे यातूनही आणखी खंबीरपणाने उभी राहील. जय हिंद".
दरम्यान, अहमदाबाद येथून उड्डाण घेताच विमान मेडिकल हॉस्टेलवर कोसळलं. या अपघातात विमानातील एकूण २४२ पैकी २४१ जणांचा मृत्यू झाला आहे. केवळ एक प्रवासी दैव बलवत्तर म्हणून या भीषण अपघातातून बचावला आहे. तर हॉस्टेलमधील काही निवासी डॉक्टर आणि आसपासच्या परिसरातील काहींचा या मृत्यू झाला आहे.