परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी या तिकडीच्या 'हेरा फेरी' सिनेमाची प्रेक्षकांवर जादू कायम आहे. याचा सीक्वेल 'फिर हेरा फेरी'ही तितकाच गाजला. परेश रावल यांना तर लोक बाबुभैय्या म्हणूनच ओळखायला लागले. गेल्या काही दिवसांपासून 'हेरा फेरी ३'ची चर्चा होती. मात्र अचानक परेश रावल (Paresh Rawal) यांनी सिनेमा सोडल्याचं जाहीर केलं आणि चाहत्यांना धक्काच बसला. अक्षयने त्यांच्यावर नुकसानभरपाईची केसही केली. मात्र आता सगळं ठीक झालं असून आपण सिनेमात परतलोय असं स्वत: परेश रावल यांनी जाहीर केलं आहे.
लोकांना गृहित धरुन चालत नाही
'हेरा फेरी ३'चा वाद नक्की काय आहे? या प्रश्नावर हिमांशु मेहता यांच्याशी बोलताना परेश रावल म्हणाले,"हेरा फेरी सारखा सिनेमा एकदाच बनतो. सतत ही जादू घडत नाही. नाहीतर त्यात तोचतोचपणा येतो. काहीच क्रिएशन राहत नाही. वाद काहीच नाहीए. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की जेव्हा लोकांना एखादी गोष्ट इतकी आवडते तेव्हा आपण जास्त काळजी घेतली पाहिजे. ती आमची जबाबदारी आहे. प्रेक्षक तुमच्यावर इतकं प्रेम करत आहेत तर तुम्ही त्यांना गृहित धरु शकत नाही. मेहनत करुन त्यांना रिझल्ट द्या. सगळे एकत्र या, मेहनत करा हेच मला सांगायचं असतं."
'हेरा फेरी ३' नक्की येणार
ते पुढे म्हणाले, "पण आता सगळं ठीक झालं आहे. सिनेमा नक्की येतोय, आधीही येणारच होता. फक्त जरा एकमेकांना फाइन ट्यून करावं लागतं. सगळेच क्रिएटिव्ह लोक आहेत. प्रियदर्शन, अक्षय, सुनील सगळेच माझे इतक्या वर्षांपासूनचे मित्र आहेत."