Join us

पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 18:57 IST

Pakistani Web Series OTT Ban in India: ओटीटी, ऑडिओ स्ट्रीमिंगसह पाकिस्तानमध्ये बनवलेल्या सर्व प्रकारच्या कंटेंटवर भारतात बंदी

Pakistani Web Series OTT Ban in India: पहलगाममधील क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार पाकिस्तानविरुद्ध सतत कठोर पावले उचलत आहे. ७ मे च्या रात्री भारतानेपाकिस्तानमधील अनेक दहशतवादी तळांवर हल्ले करून लाँच पॅड उद्ध्वस्त केले. यापूर्वी, भारत सरकारने भारतातील अनेक पाकिस्तानी सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर बंदी घातली होती. आता आणखी एक कठोर पाऊल उचलत पाकिस्तानातील इतर डिजिटल मनोरंजनाच्या कंटेंटवरही बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ओटीटी प्लॅटफॉर्म आणि मीडिया स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मना एक नियमावली जारी केली आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की तत्काल प्रभावापासून पाकिस्तानमधील सर्व प्रकारचा मनोरंजनाचा कंटेंट भारतात दाखवणे थांबवा. याचा अर्थ असा की ओटीटी प्लॅटफॉर्म, यूट्यूब आणि सर्व प्रकारच्या ऑडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर पाकिस्तानमध्ये बनवलेल्या सर्व प्रकारच्या कंटेंटवर भारतात बंदी घालण्यात आली आहे.

मंत्रालयाच्या नियमावली काय?

मंत्रालयाने आपल्या नियमावलीत म्हटले आहे की, राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करून सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म, मीडिया स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आणि थर्ड पार्टी अँपना पाकिस्तानमध्ये बनवलेल्या वेब सिरीज, चित्रपट, गाणी, पॉडकास्ट आणि इतर स्ट्रीमिंग मीडिया कंटेंट, जे सबस्क्रिप्शन किंवा इतर कोणत्याही माध्यमातून उपलब्ध आहेत, त्वरित बंद करण्याचा सल्ला दिला गेला आहे. नियमावलीत सरकारने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचाही उल्लेख केला आहे. भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तान सरकार आणि बिगर-सरकारी घटकांचे संबंध आढळून आले आहेत, असे त्यात म्हटले आहे. अलिकडेच २२ एप्रिल २०२५ रोजी दहशतवाद्यांनी पहलगामवर हल्ला केला ज्यामध्ये एका नेपाळी नागरिकासह अनेक भारतीयांचा मृत्यू झाला. या घटनेत अनेक जण जखमीही झाले, असेही म्हणटले आहे.

भारताने दहशतवादी तळांवर केला हल्ला

पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारताने ७ मे च्या रात्री पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात सुमारे १०० लोक ठार झाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला आहे. पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, जो भारतीय सैन्याने हाणून पाडला. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरूच ठेवले आणि पाकिस्तानची क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणादेखील नष्ट केली. यापुढे भारताचे पाकिस्तानवर विविध प्रकारे हल्ले सुरूच राहतील. मात्र भारताच्या हल्ल्यात कोणताही निष्पाप व्यक्ती दगावणार नाही, याची काळजी भारत सरकार वेळोवेळी घेत आहे.

टॅग्स :ऑपरेशन सिंदूरपहलगाम दहशतवादी हल्लापाकिस्तानभारतवेबसीरिजऑनलाइन