दिग्गजांनी जागवल्या ओम पुरींच्या खास आठवणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2017 16:36 IST
ओम पुरी हे नाव हिंदी चित्रपट इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांमध्ये कोरले गेलेले नाव आहे. सहज-सुंदर अभिनय आणि भारदस्त व मनाला ...
दिग्गजांनी जागवल्या ओम पुरींच्या खास आठवणी
ओम पुरी हे नाव हिंदी चित्रपट इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांमध्ये कोरले गेलेले नाव आहे. सहज-सुंदर अभिनय आणि भारदस्त व मनाला भेदून जाणाऱ्या आवाज लाभलेले ओम पुरी गेली अनेक दशके ‘लिजेंड’ म्हणून कार्यरत आहेत. आर्ट फिल्म असो वा कमर्शियल, त्यांचे नाव श्रेयावलीमध्ये असेल तर चित्रपट हमखास चांगला असणार असे डोळे झाकून विश्वास प्रेक्षकांना असे.असा हा ‘नटसम्राट’ आज सकाळी आपल्याला सोडून गेला. वयाच्या ६६ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शुक्रवारी त्यांचे निधन झाले. ही वार्ता कळताच इंडस्ट्रीमधील अनेक मान्यवर त्यांच्या घरी येण्यास सुरुवात झाली. हिंदी चित्रपटांतील अभिनेते म्हणून प्रसिद्ध असलेल्या ओम पुरींचे पदार्पण मात्र मराठी चित्रपटातून झाले.विजय तेंडुलकर लिखित नाटक ‘घाशीराम कोतवाल’वर आधारित याच नावाच्या सिनेमातून त्यांनी चंदेरी पडद्यावर पाऊल टाकले. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात जोरावर असलेली ‘कलात्मक/समांतर’ चित्रपटांची चळवळ त्यांनी अमरिश पुरी, नसीरुद्दीन शहा, शबाना आझमी आणि स्मिता पाटील अशा कलाकारांसोबत पुढे चालवली.चौकट मोडून कोणत्याही साच्यामध्ये स्वत:ला बांधून न ठेवता जोखिम उचलण्याची वृत्ती आणि नैसर्गिक अभिनय कौशल्याच्या जोरावर त्यांनी त्यांचे स्थान अढळ केलेले आहे. त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीच भरून निघणार नाही, अशी प्रतिक्रिया विविध मान्यवरांनी ‘सीएनएक्स मस्ती’कडे व्यक्त केली. त्यातील काही निवडक प्रतिक्रिया : * एक समृद्ध अभिनेता हरपला माझ्या करिअरच्या सुरूवातीलाच मी ओमपुरी यांच्या बरोबर एका या नाटकात काम केले होते. त्यावेळी सगळ्यात मोठा आधार त्यांनीच मला दिला.अभियक्षेत्रातली चढउतार, बारकावे सगळ्या गोष्टींचा भांडार होता त्यांच्याकडे त्यांच्याकडूनच या सगळ्या गोष्टी मी शिकत गेलो. ते माझ्यासाठी माझ्या मोठ्या भावाप्रमाणेच होते. नाटकाच्या तालमी दरम्यान त्यांच्याकडून मी समृद्ध होत गेलो. आज त्यांच्या जाण्याने संपूर्ण इंडस्ट्रीचा खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्याबरोबर मी खूप सिनेमे केले आहेत. त्यांच्याशी निगडीत खूप सा-या चांगल्या आठवणी माझ्या गाठीशी आहेत. मध्यंतरी त्यांच्या आयुष्यात फॅमिलीला घेऊन खूप सा-या गोष्टी घडल्या त्यावरू ते आम्हाला म्हणायचे ''तुमचे आयुष्य तुम्ही कॉम्लिकेटड बनवू नका सरळ सोप्या जगण्याने तुमचे आयुष्य खुप सोपे होते''. हा फंडा आजही मी पाळतो. त्यांच्या चांगल्या आठवणींमुळे सदैव ते जिवंत राहतील. त्यांना माझी श्रध्दांजलीगोविंद नामदेव, अभिनेता * आर्ट सिनेमाचा एक मोठा चेहरा हरपलाआर्ट सिनेमाचा एक मोठा चेहरा हरपला, एक उत्तम कलाकार त्यांची प्रत्येक भूमिका त्यांनी चपखल निभावली. 15 ऑगस्ट भागिले 26 जानेवारी या मराठी सिनेमात त्यांच्यासह काम करण्याचे मला भाग्य मिळाले. शूटिंग दरम्यानही ते असे कुठेच जाणवले नाही की ते ज्येष्ठ कलाकार आहेत. सगळ्यांशी मिळून मिसळून बोलायचे. मुळात आम्हाला कोणत्याही प्रकारेच दडपण आणू द्यायचे नाहीत. नेहमी अतिशय हसत खेळत असायचे. एक आठवण शेअर करावीशी वाटते ते एकदा आमच्या फॉर्महाऊसवर आले होते. ते बघून त्याचवेळी ते म्हणाले की तुमचे फार्महाऊस बघून मला माझ्या फार्महाऊवर जायची इच्छा झाली. खूप खूष झाले होते. ते खूप लवकर गेले अतिशय धडधाकट होते त्यामुळे या बातमी मन सुन्न झाले आहे. किशोरी शहाणे, अभिनेत्री * इंडस्ट्रीचे मोठे नुकसान आज ही बातमी ऐकुन मला धक्काच बसला. कारण गेल्याच महिन्यात मी आणि किशोरी ओम पुरींना भेटलो होतो. अतिशय मनमोकळ्या आम्ही गप्पा मारल्या. त्यांचे एक नाही तर बरेच सिनेमे माझे आवडते आहेत. मुळात त्यांना सिनेमा कोणत्या कॅटरिगीत मोडणे आवडायचे नाही त्यांच्यासाठी पॅरलल सिनेमा,कमर्शिअल सिनेमा हे काही नसून सिनेमा हा समान होता. त्यांचा तो भारदस्त आवाज, त्यांची संवादफेक शैली उत्तमच होती. त्यांच्या जाण्याने या इंडस्ट्रीने एक उत्तम कलाकार गमावला आहे. त्यांची पोकळी भरून काढणे अशक्यच आहे. दिपक बलराज वीज, फिल्म मेकर * अभिनय जगणारा अभिनेता‘ओम पुरी गेले‘ हे कळल्यावर मन्न सुन्न झाले. एवढ्या लवकर आणि असे अचानक ते आपल्याला सोडून जातील असे कधी वाटले नव्हते. अतिशय प्रेमळ, समजुतदार माणूस म्हणून मी त्यांना ओळखते. त्यांच्यासोबत काम करत असताना ते कधीच अहंकार दाखवत नाही. मी खूप लाजाळू आहे. ‘जय हो डेमोक्रसी’ या चित्रपटात आम्ही एकत्र काम केले होते. त्यांनी मला बोलते करून खूप कम्फर्टेबल केले. गंभीर अभिनयासाठी जरी ते प्रसिद्ध असले तरी वैयक्तिक आयुष्यात खूप फन लव्हिंग होते. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीचे खूप मोठे नुकनान झाले आहे.- सीम बिस्वास, अभिनेत्री * अस्सल भारतीय मातीतील कलावंतओम पुरी यांच्याबद्दल जेवढे बोलावे तेवढे कमीच आहे. एक परिपूर्ण अभिनेता असेच त्यांचे वर्णन करावे लागेल. भारतीय सिनेइतिहासात त्यांच्यासारखा कलावंत झाला नाही. रोल कोणताही असू द्या, संपूर्ण जीव ओतून काम करून ते भूमिकेला आपलेसे करून घ्यायचे. ‘अनकन्व्हेंशनल’ भूमिका-चित्रपट स्वीकारण्यात त्यांनी कधीच मागे-पुढे पाहिले नाही. कलात्मक आणि व्यवसायिक अशा दोन्ही प्रकारच्या सिनेमांना त्यांनी एक वेगळे महत्त्व प्राप्त करून दिले. ‘जाने भी दो यारों’मध्ये त्यांच्यासोबत काम करण्याचा योग येणे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट समजतो. ते अस्सल भारतीय मातीतील अभिनेते होते.- कुंदन शहा, निर्मार्ते-दिग्दर्शक * एक महान कलाकार पडद्याआड ओम पुरी यांच्यासोबत मी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते महान कलाकार आहेत हे आपण सर्वजण जाणतो. परंतू मी जेवढे त्यांना जवळून ओळखले आहे, आम पुरी यांच्यात एक चांगला माणूस दडलेला होता. गेल्या दीड वर्षांमध्ये तर मी त्यांच्या सहवासात खूप वेळा आले. एक महिन्यापूर्वीच मी त्यांना एका लेखकाच्या वाढदिवसाच्या पार्टीत भेटलो होतो. आज सकाळी ही दुख:द बातमी समजली आणि मोठा धक्काच बसला. ओमजी गेल्याचे फारच वाईटच वाटत आहे. मी शब्दांमध्ये माझ्या भावना व्यक्त करुच शकत नाही. अजुनही मला या गोष्टीवर विश्वास बसत नाही कि आता ओमजी आपल्यात राहिले नाहीत.दिलीप ताहील, अभिनेता * इंडस्ट्रीला त्यांची उणीव सतत भासेल ही बातमी कानावर पडताच मला पहिल्यांदा विश्वासच बसला नाही. मालामाल विकली या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत काम केले असल्याने त्या सेटवरच्या सर्व आठवणी पुन्हा नव्याने जाग्या झाल्या. ओम पूरी हे खूप चांगले माणूस होतो. ते सेटवर कधीच लहान मोठा असा फरक करत नव्हते. ते सेटवर ही सकाळी आमच्या सगळयांसोबत नाश्टा करत असत. आज त्यांच्या अशा अचानक जाण्याने खूपच दु:ख होत आहे. मात्र बॉलिवूडमध्ये त्यांची ही जागा कधीच कोणी भरून काढू शकत नाही. सुधा चंद्रा, अभिनेत्री