या बॉलिवूड सेलिब्रेटींनी २०१७ मध्ये घेतला जगाचा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:02 IST
२०१७ हे वर्षं काहीच दिवसांत संपणार आहे. जाणून घेऊया २०१७ मध्ये कोणत्या सेलिब्रेटींनी घेतला जगाचा निरोप...
या बॉलिवूड सेलिब्रेटींनी २०१७ मध्ये घेतला जगाचा निरोप
२०१७ हे वर्षं काहीच दिवसांत संपणार आहे. जाणून घेऊया २०१७ मध्ये कोणत्या सेलिब्रेटींनी घेतला जगाचा निरोप...ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे ४ डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी कोकिळाबेन रुग्णालयात निधन झाले. ते अनेक दिवसांपासून आजारी होते. शशी कपूर यांचा जन्म 1938 मध्ये झाला होता. त्यांच्या पश्चात करण कपूर, कुणाल कपूर आणि संजना कपूर ही त्यांची मुले आहेत. शशी कपूर यांना २०१४ मध्ये फुप्फुसामध्ये जंतू संसर्ग झाला होता. त्याआधी त्यांची बायपास सर्जरी देखील करण्यात आली होती. त्यानंतरच त्यांची तब्येत खालावत गेली. तिरछी टोपीवाले या चित्रपटाने प्रसिद्धीझोतात आलेल्या इंदर कुमारचे २८ जुलैला ह्रदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ४५व्या वर्षी चार बंगला इथल्या निवासस्थानी निधन झाले. ९०च्या दशकात इंदर कुमारने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. २० हून अधिक सिनेमात इंदर कुमारने आपल्या अभिनयाची झलक दाखवली. अभिनेता अक्षय कुमारच्या खिलाडियों का खिलाडी सिनेमात त्याने काम केले. मात्र त्याची खास जोडी जमली ती त्याचा मित्र सलमान खानसोबत. तुमको ना भूल पायेंगे, वॉन्टेड अशा विविध सिनेमात त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. सध्या इंदर कुमार त्याच्या आगामी 'फटी पडी हैं यार' या सिनेमाच्या शुटिंगममध्ये व्यस्त होता. सत्तर-ऐंशीच्या दशकात अनेक चित्रपटात दमदार भूमिका साकारलेले अभिनेते विनोद खन्ना यांचे २७ एप्रिलला कॅन्सरमुळे निधन झाले. विनोद खन्ना यांनी ‘मेरे अपने’,‘कुर्बानी’,‘पूरब और पश्चिम’,‘रेशमा और शेरा’,‘हाथ की सफाई’,‘हेराफेरी’ अशा अनेक चित्रपटांत शानदार अभिनय केला. विनोद खन्ना यांच्या कारकिर्दीची सुरुवात खलनायकाच्या भूमिकेने झाली होती. पण नंतर विनोद खन्ना हिरो म्हणून नावारूपास आलेत. १९७१ मध्ये ‘हम तुम और वो’मध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारली. विनोद खन्ना यांनी १९६८ मध्ये ‘मन का मीत’ या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे ६ जानेवारीला ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. पुण्यातील फिल्म अँण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया त्याच बरोबर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून त्यांनी अभिनयाचे शास्त्रयुक्त शिक्षण घेतले होते. ओम पुरी यांनी आपल्या करिअरची सुरुवात एका मराठी नाटकाने केली होती. १९८१ साली आलेल्या आक्रोश या चित्रपटासाठी त्यांना पहिला फिल्म फेअर अॅवॉर्ड मिळाला तर आरोहण आणि अर्धसत्य या दोन्ही चित्रपटांसाठी त्यांना सर्वोत्तम अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे १८ मे ला हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्या त्यावेळी ५९ वर्षांच्या होत्या. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचा अभिनेत्री म्हणून प्रवास सुरु झाला. मराठी रंगभूमीपासून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. ‘सविता दामोदर परांजपे’, ‘विठो रखुमाय’, ‘घर तिघांचं हवं’, ‘चल आटप लवकर’, ‘झाले मोकळे आकाश’, ‘तो एक क्षण’, ‘पुरुष’ ‘बुलंद’ ही त्यांनी अभिनय केलेली नाटक गाजली. तर मराठीतील अनेक चित्रपटात त्यांनी हिरोईनची भूमिका देखील केली आहे. सिंहासन, आंतरपाट, आपली माणसं, जिवलगा इत्यादी चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली. मैने प्यार किया, आशिकी, साजन, हम आपेक हैं कौन, वास्तव, कुछ कुछ होता हैं, हम साथ साथ हैं या गाजलेल्या हिंदी चित्रपटातील त्यांची आईची व्यक्तीरेखा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. राम मुखर्जी यांचे २२ ऑक्टोबरला निधन झाले. चित्रपट निर्माते शशाधर मुखर्जी हे राम मुखर्जी यांचे काका होते. हिंदी व बंगालीतील अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. मुंबईतील ‘फिल्मालय’ स्टुडिओतील संस्थापक सदस्यांपैकी राम मुखर्जी एक होते. त्यांची मुलगी राणी मुखर्जीचा पहिला चित्रपट ‘बाइर फुल’याची निर्मिती आणि दिग्दर्शन राम मुखर्जी यांचेच होते. हा बंगाली चित्रपट १९९६मध्ये आला होता. यानंतर १९९७ मध्ये राणीने ‘राजा की आएगी बारात’मधून बॉलिवूड डेब्यू केला. हा चित्रपटही राम मुखर्जी यांनी प्रोड्यूस केलेला होता. लेख टंडन यांचे १६ ऑक्टोबरला निधन झाले. शाहरूख खान याला शोधण्याचे श्रेय लेख टंडन यांना दिले जाते. त्यांनीच ‘दिल दरिया’ या टीव्ही सीरिअलसाठी शाहरूखला कास्ट केले होते. उत्तरायण, आम्रपाली, प्रोफेसर, झुक गया आसमान, जहा प्यार मिले, आंदोलन, दुल्हन व्ही जो पिया मन भाये, शारदा, एक बार कहो, अगर तुम ना होते, दुसरी दुल्हन, मिल गयी मंजिल मुझे त्यांचे हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. आम्रपाली या चित्रपटातून लेख टंडन यांनी आपल्या दिग्दर्शनाची सुरुवात केली होती. सोबतच रंग दे बसंती आणि चेन्नई एक्स्प्रेस सारख्या चित्रपटांत ते अभिनय करतानाही दिसले. शाहरूखच्या स्वदेश या चित्रपटातही त्यांनी काम केले होते. पान सिंग तोमर आणि पीपली लाईव्ह सारख्या चित्रपटात काम केलेले अभिनेते सीताराम पांचाळ यांचे १० ऑगस्टला निधन झाले. २०१४ मध्ये त्यांना कॅन्सरचे झाल्याचे निदान झाले होते. यानंतर ही त्यांनी हिम्मत न हारता जॉली एलएलबीमध्ये काम केले होते. त्यांच्या निधनाच्या काही महिने आधीपर्यंत देखील ते चित्रपटाचे शूटिंग करत होते. शूटिंग दरम्यानचे काही फोटो त्यांनी फेसबुकवर शेअर देखील केले होते. या फोटोंमध्ये त्यांना ओळखणे ही अवघड झाले होते. १९९४ साली आलेल्या बँडेट क्वीन या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.