बॉलिवूडमधील आदर्श जोडपे: नर्गिस दत्त-सुनील दत्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2017 15:33 IST
एकेकाळी आपल्या आवाजाने सर्वांच्या मनावर राज्य करणारे सुनील दत्त पुढे नर्गिस यांचे पती म्हणून अधिक गाजले. राज कपूर यांच्यापासून ...
बॉलिवूडमधील आदर्श जोडपे: नर्गिस दत्त-सुनील दत्त
एकेकाळी आपल्या आवाजाने सर्वांच्या मनावर राज्य करणारे सुनील दत्त पुढे नर्गिस यांचे पती म्हणून अधिक गाजले. राज कपूर यांच्यापासून दुरावलेल्या नर्गिस यांना अश्रू ढाळण्यासाठी दिलेला खांदा हा त्यांच्या आयुष्याचा घटक बनला. या दोघांचे प्रेम बॉलिवूडमधील आदर्श म्हणून ओळखले जाते. आदर्श पती म्हणून सुनील दत्त यांचे नाव आजही सर्वत्र आहे. त्यांच्या या नावाजलेल्या प्रेमकथेविषयी... सुनील दत्त (मुळ नाव बलराज दत्त) यांचा जन्म पूर्वीच्या पंजाब राज्यातील झेलम जिल्ह्यातील खुर्दी (आता पाकिस्तान) येथे झाला. फाळणीनंतर हे कुटुंब भारतामध्ये आले. सुनील दत्त यांनी मुंबईच्या जयहिंद कॉलेजमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी बस कंडक्टरचीही नोकरी केली. त्यांनी रेडिओ सिलोनवर उद्घोषक म्हणून काम करण्यास सुरूवात केली. त्यावेळी अमीन सयानी त्यांच्यासोबत होते. इतके सुंदर दिसत असताना चित्रपटात काम का करीत नाही, असा प्रश्न त्यांना त्यावेळी केला जायचा. अशाच एका मुलाखतीनंतर निर्माता रमेश सहगल यांनी त्यांना चित्रपटात काम करण्याविषयी विनंती केली. त्यानंतर १९५५ साली तयार झालेला ‘रेल्वे स्टेशन’ हा त्यांचा पहिला चित्रपट. मदर इंडिया (१९५७) या चित्रपटाने त्यांना स्टार केले. साधना, सुजाता, मुझ जीने दो, गुमराह, वक्त, खानदान, पडोसन, हमराज हे त्यांचे गाजलेले चित्रपट. मुझे जीने दो आणि खानदान या चित्रपटातील त्यांच्या भूमिकांना अनेक पुरस्कारही मिळाले. पन्नाशीच्या काळात सुनील दत्त हे बॉलिवूडमध्ये स्थिर होण्यासाठी झटत असताना त्यांची आणि नर्गिस यांची भेट झाली. ‘मदर इंडिया’ंच्या सेटवर त्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता नर्गिस यांना आगीपासून वाचविले. त्यानंतर नर्गिस यांनी त्यांची खूप काळजी घेतली. या दरम्यान त्यांचे प्रेम अधिक दृढ झाले. राज कपूर यांच्यापासून दुरावलेल्या नर्गिस यांना एक सहारा हवा होता, तो सुनील दत्त यांच्यामुळे मिळाला, अन्यथा नर्गिस यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता.आणखी वाचा : ऐ नर्गिसे मस्ताना: नर्गिस यांची प्रेमळ परिकथा या दोघांमधील प्रेमसंबंध खूप उच्च दर्जाचे होते. दोघेही एकमेकांना प्रेमपत्रे लिहायचे. त्यात एकमेकांचा उल्लेख मर्लिन मन्रो, एल्व्हिस प्रिंसले या नावाने करायचे. ते एकमेकांना डार्लिंगजी असेही म्हणायचे. नर्गिस आणि राज कपूर यांच्यातील प्रेमप्रकरणांबाबत स्पष्टपणे बोलावे असे मत सुनील दत्त यांचे असायचे. पूर्वीच्या काळी गाजलेल्या अभिनेत्रींच्या पतींबाबत फारसे चांगले बोलले जात नसे. अशाही स्थितीत सुनील दत्त यांनी नर्गिस यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.आणखी वाचा : संजय दत्तला करायची होती आपल्या बायोपिकमध्ये वडिलांची भूमिका सुनील दत्त यांचे वडील लहानपणी वारले. नर्गिस यांनी कमी वयात काम करण्यास सुरूवात केली होती. दोघांनाही फाळणीचा त्रास भोगावा लागला होता. आपल्या मुलांना कोणताही त्रास होऊ नये अशी या दोघांची धारणा होती. ईश्वर देसाई यांनी ‘डार्लिंगजी: द ट्रू लव्ह स्टोरी आॅफ नर्गिस अँड सुनील दत्त’ या पुस्तकात या दोघांच्या प्रेमप्रकरणावर सविस्तर लिहिले आहे. सत्तरच्या दशकात त्यांना काम मिळेनासे झाले होते. त्यांनी नाईलाजास्तव खलनायकांच्या भूमिकाही स्वीकारल्या. नर्गिस यांना कॅन्सर झाल्यानंतर ते पूर्णत: खचून गेले होते. त्यात मुलगा संजय दत्त यालाही ड्रग्जचे व्यसन लागल्याने ते पुरते कोलमडले. त्यांनी ड्रग्ज आणि कॅन्सरविरोधात मोठी पदयात्राही काढली. नर्गिस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी नर्गिस दत्त फाऊंडेशनची स्थापना केली. त्यांनी अनेकांना मदत केली. पुढे ते राजकारणात आले. ते मुंबईतून लोकसभेचे सदस्यही होते. २५ मे २००५ रोजी त्यांचा मृत्यू झाला.