दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य जवळपास ४ वर्षांच्या रिलेशनशीपनंतर आता विभक्त झाले आहेत. त्यांच्या नात्यात कटुता का आली, याचे कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे. मात्र याबाबत अनेक उलटसुलट चर्चा ऐकायला मिळाल्या. अनेकांनी तर्कवितर्क लावले आहेत. समांथाने २०० कोटी पोटगी नाकारली आहे. मात्र घटस्फोटामुळे तिच्या चारित्र्यावर टीका करत असल्याचेही पहायला मिळत आहे. अखेर समांथाने (Samantha Akkineni) या सर्वांबाबत चुप्पी तोडली आहे.
समांथा अक्किनेनीने एका नोटच्या माध्यमातून आपली बाजू मांडल्याचे समजते आहे. ती म्हणाली की, माझ्या खासगी जीवनात आलेल्या या वादळामध्ये तुमच्या भावनिक सहभागाने मला आधार दिला आहे. तुमच्या सहानुभूतीसाठी मी आभारी आहे. ज्यामुळे मी अफवा आणि वाईट भावनांविरोधात उभी राहू शकले. ते म्हणतात की माझी काही प्रेम प्रकरणे होती, मला बाळ नको हवे होते, मी संधी साधू आहे आणि आता तर असेही म्हटले जात आहे की अनेकदा माझा गर्भपातदेखील झाला आहे.