या सगळ्या चित्रपटांच्या व्यवसायाकडे आपण पाहिल्यास एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने जाणवते. 2005 सालच्या आधी ईदच्या दिवशी प्रदर्शित होईनही बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करणारे खूपच कमी चित्रपट आहेत. कभी खुशी कभी गम, कल हो ना हो, वीर झारा, गरम मसाला, डॉन, भुलभूलैय्या असे या दिवशी प्रदर्शित झालेले चित्रपट हिट ठरले. पण 2009 च्या ईदनंतर ईद ही केवळ सलमानच्या चित्रपटांसाठी राखीव असलेली आपल्याला पाहायला मिळाली. वाँटेडनंतर प्रत्येक ईदला आलेल्या सलमानच्या चित्रपटाने तिकिटबारीवर प्रचंड कमाई केली. केवळ 2013ला शाहरुख खानचा चेन्नई एक्सप्रेस हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानेदेखील रेकॉर्डतोड कमाई केली. त्यामुळे 2009 नंतरची प्रत्येकच ईद बॉक्स ऑफिसच्या लोकांसाठी खूपच लकी ठरली. यावर्षी ईदला प्रदर्शित झालेल्या सुलतान या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 35 कोटीहून अधिक गल्ला जमवला. आज सलमान ईदचा बादशहा मानला जात असला तरी सलमाननेही याआधी ईदला अनेक फ्लॉप चित्रपट दिले आहेत.
ईद, दिवाळी, ख्रिसमस या सणांना आपल्या कुटुंबासमवेत अथवा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत चित्रपट पाहायला जाणाऱ्या लोकांची संख्या ही खूप असते. त्यामुळे या दिवशी चित्रपट प्रदर्शित करणे हे निर्मात्यांसाठी फायदेशीर असते. अनेक निर्माते कित्येक महिने आधीच ही तारीख ठरवतात.
तीन सण, तीन खानांच्या नावावर
गेल्या 10 वर्षांत आपल्याकडे मल्टीप्लेक्सची संख्या वाढली आहे. येथील तिकिटदर हे खूप जास्त असतात. तसेच एकाच दिवसात अनेक शो या मल्टीप्लेक्समध्ये दाखवले जातात. सणाच्या दिवशी लोक आवर्जून चित्रपट पाहायला जातात. त्यामुळे या दिवशी चित्रपट प्रदर्शित झाला की, या मल्टीप्लेक्सच्या दरांमुळे पहिल्या तीनच दिवसांत चित्रपटाची करोडोची कमाई होते. त्यामुळे या दिवशी चित्रपट प्रदर्शित करणे हे व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय चांगले असते. आज सलमान खान, आमिर खान आणि शाहरुख खान या तीन खानांचा बॉलिवुडवर दबदबा आहे. त्या तिघांपैकी कोणत्याही दोघांचे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले तर एकाच्या चित्रपटाला फटका बसतो. त्यामुळे या तिघांनी प्रत्येक सण वाटून घेतला असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. सण म्हटला की, दोन दिवस तरी सुट्टी असते. त्यामुळे या दोन-तीन दिवसांत चित्रपटचा व्यवसाय चांगला होतो. सलमानचे चित्रपट ईदला, शाहरुखचे दिवाळीत आणि आमिरचे चित्रपट ख्रिसमसला प्रदर्शित होत असल्याचे आपल्याला गेल्या 6-7 वर्षांत पाहायला मिळत आहे. या तिघांसमोर कोणत्या इतर अभिनेत्याचा चित्रपट तग धरू शकत नाही हे बॉलिवुडमधील मंडळींना चांगलेच माहीत असल्याने निर्मातेही त्यांच्यासोबत चित्रपट प्रदर्शित करणे टाळतात. आपल्या बॉलिवुडच्या चित्रपटांचा विचार केला तर वर्षाच्या मध्यानंतर आलेले चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर अधिक चांगली कमाई करतात असेच आपल्याला पाहायला मिळते. आणि हे तिन्ही सण हे याच दरम्यानच येत असल्याने त्याचा फायदाही चित्रपटांना नक्कीच होतो.
- एन.पी. यादव, ट्रेड अॅनालिस्ट