आदित्य चोप्रा दिग्दर्शित १९९५ साली आलेला 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' (DDLJ) भारतीय सिनेमाच्या इतिहासात सर्वात गाजलेला सिनेमा आहे. याच सिनेमामुळे बॉलिवूडला शाहरुख-काजोल ही सुपरहिट जोडी मिळाली. आजही सिनेमाची गाणी अनेक ठिकाणी लावतात. मुंबईतल्या मराठा मंदिरमध्ये तर हा सिनेमा अजूनही सुरु आहे. 'डीडीएलजे'चा पार्ट २ येणार आहे का? असा प्रश्न काजोलला (Kajol) विचारण्यात आला.
इन्स्टंट बॉलिवूडला दिलेल्या मुलाखतीत काजोलला 'डीडीएलजे २' येणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर काजोल म्हणाली, "नाही. कधीच नाही. डीडीएलजे २ चा विचारच करु नका. सिमरन आणि राज ट्रेनमध्ये चढतात. त्यानंतर काय होतं याची काळजी करु नका. तो सीन तिथेच सोडला पाहिजे. कोणी कोणाला मारलं, किती मुलं झालं. कोणालाही याबद्दल जाणून घ्यायची गरज नाही. जो शेवट दाखवला गेला तोच योग्य होता आणि आता ते खेचलं तर सिनेमाची जादूच संपून जाईल."
शाहरुखसोबतच्या मैत्रीबद्दल काजोल म्हणाली, "आम्ही करिअरच्या अनेक टप्प्यांवर सोबत सिनेमे केले आहेत. आम्ही आपापल्या पार्टनरसोबत लग्न केलं. मुलं झाली. आम्ही आपापलं आयुष्य जगत आहोत. अनेक वर्षांपासून आमची मैत्री आहे. आम्ही एकमेकांना आयुष्यात पुढे जाताना बघितलं आहे. एकमेकांसोबत काम करताना आणि चांगल्या मित्रपरिवारासोबत आयुष्य सुरळीत सुरु आहे. आजकाल नाती टिकवणं खूप कठीण आहे आणि करण जोहर तर सर्वांचा मित्र आहे. मी त्याचा हा गुण खूप आवडतो. हे सोपं नाहीए."