गुजरातमधील अहमदाबाद येथे १२ जून रोजी लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान कोसळून मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत २७० जणांचा मृत्यू झाला. या विमान अपघातानंतर संपूर्ण देश हळहळला आहे. अहमदाबाद विमान अपघातानंतर अनेकांनी घटस्फोट रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं बॉलिवूड अभिनेत्री रागेश्वरी लुंबा हिने म्हटलं आहे. तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.
"अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर लोकांनी त्यांच्या कुटुंबीयांना फोन करण्यास सुरूवात केली आहे. आणि माझ्या माहितीतल्या दोन कपल्सने त्यांचा घटस्फोटाचा निर्णयही रद्द केला आहे. अनेकांनी त्यांच्या इगोला कमी महत्त्व देऊन वाद सोडवण्यास सुरुवात केली आहे. सायकोलॉजिस्टच्या म्हणण्यानुसार, आपल्यावर कोणाची कृपा आहे हे समजण्यासाठी माणसाच्या आयुष्यात अशा गोष्टी घडाव्या लागतात. चांगल्या गोष्टींची जाणीव होण्यासाठी वाईट काळातून जावे लागते. यशाची गोडी चाखण्यासाठी कित्येक अपयश पचवावे लागतात", असं तिने म्हटलं आहे.
पुढे ती म्हणते, "अशा घटना आपल्याला आयुष्यात कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, यावर विचार करायला भाग पाडते. जीवन हे तकलादू आहे आणि नाती पवित्र आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवाल आणि त्यांना स्पेशल असल्याची जाणीव करून द्याल, अशी अपेक्षा मी करते. तुम्ही काय म्हणालात, तुम्ही काय कपडे घातलेत, तुम्ही कसे दिसता हे लोक एकवेळ विसरून जातील, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागलात हे ते कधीच विसरू शकत नाहीत. त्यामुळे लोकांना स्पेशल फील करवून द्या. फोन उचला, कोणाला तरी फोन लावा आणि कुटुंबीयांना स्पेशल असल्याची जाणीव करून द्या".