Amitabh Bachchan: हिंदी सिनेसृष्टीतील महानायक म्हणून अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना ओळखलं जातं. बिग बींनी त्यांच्या फिल्मी कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट इंडस्ट्रीला दिले आहेत. त्यापैकी त्यांचे काही चित्रपट फ्लॉप देखील झाले. असाच एक फ्लॉप चित्रपट ज्याची सगळीकडे चर्चा झाली होती. हा चित्रपट म्हणजे 'अग्निपथ'.अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्या हा चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी थिएटरमध्ये प्रचंड नुकसान केलं होतं. नेमकं त्यावेळी काय घडलं होतं?
'अग्निपथ' चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी विजय दीनानाथ चौहान नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. 'विजय दीनानाथ चौहान... पूरा नाम' 'अग्निपथ' चित्रपटातील अमिताभ यांच्या डायलॉगची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये आहे. तसंच या चित्रपटासाठी बिग बींनी डबिंग सुद्दा केलं होतं. मात्र, ज्यावेळी हा चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी अमिताभ बच्चन यांचा बदललेला आवाज ऐकून प्रेक्षक इतके संतापले की त्यांनी थिएटरमधील स्पीकर्सचं नुकसान केलं होतं. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत अभिषेक बच्चनने याबद्दलची आठवण शेअर केली.
'इंडिया टुडे' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिषेक बच्चनने याबद्दल खुलासा केला. त्याविषयी बोलताना अभिषेक म्हणाला, "जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा अशा बातम्या कानावर येऊ लागल्या की लोक थिएटरमध्ये साउंड सिस्टम तोडत आहेत. कारण, त्यावेळी त्यांना वाटलं की, अमिताभ बच्चन यांच्या आवाजाला अचानक काय झालं? कदाचित स्पीकर्स बंद असावेत." अमिताभ बच्चन हे त्यांच्या विशिष्ट आवाजाच्या शैलीसाठी ओळखले जातात. त्यावेळी बिग बिंनी केलेलं डबिंग तसेच त्यांचा आवाज प्रेक्षकांना स्वीकारणं कठीण गेलं.
पुन्हा स्टुडिओत जाऊन त्यांनी रात्रभर डबिंग केलं...
त्यानंतर पुढे अभिषेक म्हणाला, "मला आठवतंय एके दिवशी भररात्री स्टुडिओमध्ये गेले. शुक्रवारचा तो दिवस होता. त्यावेळी मी खूपच लहान होतो आणि त्या रात्री मी देखील त्यांच्यासोबत स्टुडिओत गेलो. ते रात्रभर चित्रपट डब करत होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी ८ वाजता ते स्टुडिओतून बाहेर पडले."
दरम्यान, अग्निपथ हा चित्रपट १९९० मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील अमिताभ यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. शिवाय यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. प्रचंड मेहनत करुनही 'अग्निपथ' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसं यश मिळालं नाही.