बॉलिवूडचा किंग खान शाहरुख(Shah Rukh Khan)चा प्रसिद्ध बंगला 'मन्नत' नेहमीच चाहत्यांच्या आणि प्रसार माध्यमांच्या नजरेत राहिला आहे. मुंबईतील वांद्रे येथील बँडस्टँड परिसरात असलेल्या या आलिशान मालमत्तेला लोक पर्यटन स्थळ म्हणून पाहण्यासाठी येतात. पण यावेळी 'मन्नत' (Mannat Bunglow) त्याच्या भव्यतेमुळे नाही तर एका वादामुळे चर्चेत आला आहे.
खरेतर, २० जून २०२५ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने 'मन्नत'ला भेट दिली. बंगल्यात सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामादरम्यान कोस्टल रेग्युलेशन झोन (सीआरझेड) च्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करणाऱ्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, तक्रार मिळाल्यानंतर 'मन्नत' जागेची पाहणी करण्यात आली आणि आता त्यावर सविस्तर रिपोर्ट तयार केला जात आहे, जो संबंधित अधिकाऱ्यांना सादर केला जाईल.
बीएमसीचे अधिकारी पोहोचले मन्नत बंगल्यावर यादरम्यान, बीएमसीच्या एच-वेस्ट वॉर्डच्या इमारत आणि कारखाना विभागाचे अधिकारी व इमारत प्रस्ताव पथक देखील उपस्थित होते. मात्र शाहरुख खानच्या व्यवस्थापकाने संपूर्ण प्रकरण स्पष्ट केले आहे आणि म्हटले की, "सर्व परवानग्या आधीच घेतल्या गेल्या आहेत आणि कोणतेही नियम मोडलेले नाहीत." त्याचवेळी, माजी आयपीएस अधिकारी आणि वकील वाय.पी. सिंह यांनी 'मन्नत' बद्दल गंभीर आरोप केले तेव्हा या प्रकरणाला आणखी वेग आला. त्यांनी दावा केला की हा बंगला प्रत्यक्षात 'विला व्हिएन्ना' नावाची एक वारसा रचना होती. सिंह यांच्या मते, २००५ मध्ये या इमारतीच्या मागे सात मजली इमारत बांधण्यात आली होती, तर त्यावेळी अर्बन लैंड सीलिंग अॅक्टद्यानुसार अशा बांधकामांना मनाई होती. त्यांनी आरोप केला की शाहरुख आणि गौरी खान यांनी १२ लहान फ्लॅटसाठी बीएमसीकडून मंजुरी घेतली होती, जी नंतर एकत्रित करून आलिशान निवासस्थानात रूपांतरित करण्यात आली, जी नियमांविरुद्ध आहे.
'मन्नत'बद्दल गौरी खान म्हणाली...सध्या 'मन्नत'चे मोठ्या प्रमाणात नूतनीकरण सुरू आहे. गौरी खानने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले होते की, काम पूर्ण होण्यासाठी आणखी एक वर्ष लागेल. या कारणास्तव, खान कुटुंब सध्या पाली हिलमध्ये असलेल्या 'पूजा कासा' नावाच्या एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहत आहे, ज्याचे भाडे दरमहा सुमारे २४ लाख रुपये असल्याचे सांगितले जाते.