आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' गाजला आणि आता 'धुरंधर: द रिव्हेंज'ही तुफान चालतोय. जो तो सिनेमाचीच चर्चा करत आहे. बॉलिवूडमधूनही अनेक सेलिब्रिटींनी सिनेमाच्या टीमचं कौतुक केलं. त्यांच्यासाठी कौतुकास्पद पोस्टही ठेवली. मात्र 'धुरंधर'च्या यशामुळे बॉलिवूडकरांचा जळफळाट झाला असणार असं वक्तव्य स्टॅण्डअप कॉमेडियन झाकिर खानने नुकतंच एका अवॉर्ड सोहळ्यात केलं. आता त्याच्या या वक्तव्यावरुन अभिनेत्री अमिषा पटेलने त्याला थेट सुनावलं आहे.
अमिषा पटेलने x वर लिहिले, "मित्रा, नकारात्मकता पसरवणं थांबव, फिल्म इंडस्ट्रीने 'धुरंधर' सिनेमाचा सन्मान आणि आदर राखला आहे. शाहरुख, सलमान, सनी देओल, हृतिक रोशन, अजय देवगणसारख्या सुपरस्टार्सने १ नाही तर २५ पेक्षा जास्त मेगा हिट सिनेमे दिले आहेत आणि यापुढेही देत राहतील. चील..सर्वांनी आधीच कित्येक वर्षांपासून गदर माजवला आहे आणि यापुढेही माजवतील."
अमिषा पटेलच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनी मात्र तिलाच सुनावलं आहे. 'तुला झाकीरचा पॉइंट समजलाच नाही' अशी प्रतिक्रिया लोकांनी दिली आहे.
नेमकं काय म्हणाला होता झाकीर खान?दोन दिवसांपूर्वी एका पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन करताना झाकीर खान म्हणाला होता की, "तुम्ही सोशल मीडियावर कितीही अभिनंदनाचे पोस्ट टाका किंवा मुलाखतींमध्ये हा माझा आवडता चित्रपट आहे असं सांगा, पण खरं तर 'धुरंधर'च्या यशामुळे सर्वांचाच जळफळाट झाली आहे. चित्रपटात बॉम्ब लियारीमध्ये फुटले पण त्याचा धूर वांद्रे ते जुहूपर्यंत (सेलिब्रेटींच्या वस्त्या) दिसतोय." बॉलीवूडमधील बडे स्टार्स या चित्रपटाच्या यशाने घाबरले आहेत, असा टोला त्याने लगावला होता.