'हीरामंडी' फेम अभिनेत्री अदिती राव हैदरी आपल्या सौंदर्यामुळे ओळखली जाते. अदितीच्या सौंदर्यावर लाखो चाहते घायाळ होतात. अदिती अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे. तेलुगु, तमिळ आणि हिंदी सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' सीरिजमधील तिची गजगामिनी चाल खूप व्हायरल झाली. गेल्या वर्षी अदितीने साऊथ अभिनेता सिद्धार्थसोबत दुसरं लग्न केलं. मात्र आता लग्नानंतर तिला कामच मिळत नसल्याचा खुलासा तिने नुकताच केला आहे.
लग्नानंतर महिलांच्या करिअरवर परिणाम होतो. मात्र गेल्या काही वर्षात यात बदल झाला आहे. फिल्म इंडस्ट्रीतही अनेक अभिनेत्री लग्नानंतर, मुलांच्या जन्मानंतरही अॅक्टिव्ह आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अभिनेत्री अदिती हैदरीने सिद्धार्थशी लग्न केलं. नुकतंच तिने लग्नानंतरच्या करिअर भाष्य करताना आश्चर्यकारक खुलासा केला. लिली सिंहला दिलेल्या मुलाखतीत अदिती म्हणाली, "हीरामंडीसाठी माझं इतकं कौतुक झालं. मला प्रसिद्धी मिळाली. पण म्हणून मी माझा पुढचा सिनेमा किंवा सीरिज साईन केला आहे का? तर नाही. मी अजूनही वाट बघत आहे. नेटफ्लिक्सवरची नंबर वन सीरिज करुनही मला पुन्हा काम मिळालेलं नाही. मला ऑफर्स येतील याची मी वाट पाहत आहे."
ती पुढे म्हणाली, "हीरामंडी बिग बजेट सीरिज होती. मुख्य म्हणजे यात सगळ्या महिला पात्र होत्या. याचे क्रिएटर एवढे मोठे होते. आता अशी सीरिज पुन्हा बनेल का? तर मला आशा आहे नक्की बनेल. स्टोरीटेलिंगची पॉवर खूप मोठी आहे. मग तो शो पाच महिला, किंवा तीन महिला किंवा तीन लहान मुलांवर किंवा प्राण्यांवर कशाही असेल, मला फक्त स्टोरीटेलिंगची जादू पाहायची आहे. महिला नवीन आयुष्य जन्माला आणतात त्यामुळे स्टोरीटेलिंगमध्येही त्यांचा समान सहभाग असला पाहिजे."