Mamta Kulkarni : ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) जवळपास २५ वर्षानंतर मायदेशी परतली आहे. त्याकाळी ममताची चाहत्यांमध्ये एक वेगळीच क्रेझ होती. 'तिरंगा' या चित्रपटाच्या माध्यमातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ममताने चाहत्यांना आपल्या अभिनयासह सौंदर्यानेही भुरळ घातली होती. बॉलिवूडमधील करिअरप्रमाणे ममताचं वैयक्तिक आयुष्यही प्रचंड चर्चेत राहिलं. अंडरवर्ल्ड छोटा राजनबरोबर तिचं नाव जोडलं गेलं होतं. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या नावाची चर्चा होताना दिसतेय. भारतात परत आल्यानंतर ममता कुलकर्णी पुन्हा अभिनय श्रेत्रात कमबॅक करणार का? याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. त्यावर अभिनेत्रीने मौन सोडलं आहे.
नुकतीच अभिनेत्री ममता कुलकर्णीने न्यूज एजेंसी 'आईएएनएस' सोबत खास बातचीत केली. त्यादरम्यान अभिनेत्रीने मायदेशी परत येण्यामागचं कारणही सांगितलं. त्यावेळी संवाद साधताना ममता कुलर्णीने बॉलिवूड इंडस्ट्रीत कमबॅक करणार असल्याच्या चर्चांवर अखेर मौन सोडलं आहे. "आता मी अध्यात्माची वाट धरली आहे. मला बॉलिवूडमध्येही कोणतीही रुची नाही. त्याचबरोबर आता माझं तेवढं वयही नाही की बॉलिवूडमध्ये कमबॅक करू शकेन. त्यामुळे आता मी बॉलिवूडचा विचार करणं सोडून दिलं आहे."
त्यादरम्यान अभिनेत्रीने बरेच खुलासे केले. त्यावेळी ती म्हणाली, "मला मान्य आहे की बॉलिवूडने मला नाव आणि प्रसिद्धी मिळवून दिली. पण, भारत देश सोडून गेल्यानंतर मी बॉलिवूडला सुद्धा रामराम केला."