बॉलिवूडमध्ये बच्चन कुटुंबाचं मोठं नाव आहे. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन दोघंही दिग्गज कलाकार आहेत. त्यांचा मुलगा अभिषेक बच्चननेही इंडस्ट्रीत स्वत:चं स्थान निर्माण केलंय. तर सून ऐश्वर्या राय बच्चनला वेगळ्या परिचयाची गरज नाही. सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर ती इंडस्ट्रीत सर्वात आघाडीवर आहे. मधल्या काळात अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे बच्चन कुटुंबात वादळ आलं होतं. अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ऐश्वर्या आणि लेक आराध्या दोघीच दिसत होत्या. तर इतर सदस्य एकत्र दिसत होते. यामुळे घटस्फोटाच्या चर्चा आणखी जोर धरुन होत्या. या चर्चांवर आतापर्यंत कुटुंबातील एकानेही भाष्य केलं नव्हतं. आता नुकतंच अभिषेकनेच (Abhishek Bachchan) या चर्चांवर मौन सोडलं आहे.
ऐश्वर्याला कधी प्रपोज केलं?
अभिषेक बच्चन सध्या आगामी 'कालीधर लापता' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्याने ऐश्वर्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तो म्हणाला, "२००७ साली आलेला गुरु सिनेमा ना केवळ माझ्या करिअरसाठी खास होता पण वैयक्तिक आयुष्यातही महत्वाचा ठरला. सिनेमाच्या न्यूयॉर्क येथे झालेल्या प्रीमियरनंतर मी ऐश्वर्याला प्रपोज केलं होतं. माझ्यासाठी जवळपास सगळेच सिनेमे वैयक्तिकदृष्याही महत्वाचे राहिले आहेत."
नकारात्मकता लवकर पसरते
वैयक्तिक आयुष्याबद्दल सोशल मीडियावर अनेक अफवा पसरल्या. त्यावर अभिषेक म्हणाला, "मला वाटतं जे लोक अशा अफवा पसरवतात त्यांना खरं काय ते ऐकण्यात कदाचितच रस असतो. सुरुवातीला मला या अफवांमुळे काहीही फरक पडायचा नाही. पण आता माझं कुटुंब आहे. मी कितीही स्पष्टीकरण दिलं तरी लोक माझ्या म्हणण्याचा विपर्यास करत चुकीच्या गोष्टी पसरवतात. कारण नकारात्मक गोष्टी लवकर पसरतात. तुम्ही माझं आयुष्य जगत आहात का? मी ज्यांना उत्तर द्यायला बांधील आहे त्यांच्याशी तुम्ही बांधील नाही आहात. जे लोक अशी नकारात्मकता पसरवतात त्यांनी जरा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.