Join us  

आयला ! 'अंदाज अपना अपना'च्या सिक्वेलमधून आमीर, सलमान बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2017 3:46 PM

चित्रपटातील कलाकारांपासून ते डायलॉगपर्यंत सर्व काही आजही प्रेक्षकांच्या लक्षात असून त्यावर अजूनही कॉलेज कट्ट्यांवर चर्चा होत असते

मुंबई, दि. 26 - 90 च्या दशकात आलेल्या 'अंदाज अपना अपना' चित्रपटातील आमीर आणि सलमान खानची जुगलबंदी पाहण्यात प्रेक्षकांना आजही तितकीच मजा येते. विनोदी चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाचा उल्लेख न होणं तसं कठीणच. चाहत्यांना आमीर खान आणि सलमान खान यांना एकत्रित पाहण्याची मिळालेली ती एकमेव संधी होती. चित्रपटातील कलाकारांपासून ते डायलॉगपर्यंत सर्व काही आजही प्रेक्षकांच्या लक्षात असून त्यावर अजूनही कॉलेज कट्ट्यांवर चर्चा होत असते. विशेष म्हणजे या चित्रपटाचा सिक्वेल येत आहे. पण प्रेक्षकांना खळखळून हसवणारी आमीर - सलमानची जोडी या सिक्वेलमध्ये पाहायला मिळणार नाही. 

आमीर खान आणि सलमान खान यांना सिक्वेलमधून डच्चू देण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्याजागी रणबीर कपूर, रणवीर सिंग, वरुण धवन यांच्यापैकी दोघांची निवड होण्याची शक्यता आहे. आता या तिघांमधील कोण दोघं अमर आणि प्रेमच्या भूमिकेत दिसतील हे कळण्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल.

'अंदाज अपना अपना' 1994 साली प्रदर्शित झाला होता. राजकुमार संतोषी यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. राजकुमार संतोषी यांनी सिक्वेलसाठी तयार सुरु केली असून मूळ चित्रपटातील एकाही मुख्य कलाकाराला यात भूमिका दिलेली नाही. याआधी आमीर आणि सलमान सिक्वेलमध्ये असतील असं सांगण्यात येत होतं, मात्र आता या जोडगोळीला डच्चू देण्यात आल्याचं कळलं आहे. विशेष म्हणजे रवीना आणि करिष्माला आधीच चित्रपटापासून दूर ठेवण्यात आलं होतं.

रवीनाला जेव्हा सिक्वेलबद्दल विचारण्यात आलं होतं तेव्हा तिने सांगितलं होतं की, ‘माझा आणि करिष्माचा फोटो भिंतीवर टांगला असेल. मग आमीर आणि सलमान म्हणतील- आमच्या बायका मेल्या, आता आम्ही काय करु’ आणि मग ते 21 वर्षांच्या हिरोईनमागे पळतील’. 

पन्नाशीचे हिरो तरुण हिरोईनमागे पळताना दाखवणं वल्गर वाटतं. रणबीर कपूर, रणवीर सिंग, वरुण धवन यासारख्या ताज्या दमाच्या कलाकारांकडे जबरदस्त कॉमेडी सेन्स आहे असल्याने त्यांची निवड होईल, असं राजकुमार संतोषी बोलले आहेत.