देशातील महिला आता केवळ बचतीपुरत्या मर्यादित न राहता, आपल्या वृद्धापकाळाच्या आर्थिक नियोजनाबाबतही जागरूक झाल्या आहेत. केंद्र सरकारच्या 'अटल पेन्शन योजने'त (एपीवाय) सहभागी होणाऱ्या नवीन ग्राहकांमध्ये महिलांचे प्रमाण तब्बल ५५ टक्क्यांवर पोहोचले असून, हे चित्र बदलत्या भारताची नवी ओळख ठरत आहे. पंतप्रधान जन-धन योजनेअंतर्गत बचत खाती उघडल्यानंतर, महिलांनी आता पेन्शन योजनांकडे आपला मोर्चा वळवला आहे. आकडेवारीनुसार, २०२१-२२ मध्ये या योजनेत महिलांचा सहभाग ४४ टक्के होता. २०२४-२५ या आर्थिक वर्षात तो वाढून ५५ टक्के झाला. 'अटल पेन्शन योजने'चे ३१ ऑक्टोबरपर्यंत एकूण ८.३४ कोटी सदस्य होते. त्यात महिलांची भागीदारी ४८ टक्क्यांवर होती. १८ ते ४० वयोगटातील कोणतीही व्यक्ती या योजनेत सहभागी होऊ शकते.
गुंतवणुकीचे गणित आणि लाभ
या योजनेचे मुख्य आकर्षण म्हणजे अल्प गुंतवणुकीत मिळणारे शाश्वत उत्पन्न. जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या १८ व्या वर्षी दरमहा २१० रुपये गुंतवले, तर वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावर त्याला दरमहा ५,००० पेन्शन मिळते.
मासिक पेन्शन १८ वर्षे २५ वर्षे ४० वर्षे
१,००० रुपये ४२ रु. ७६ रु. २९१ रु.
२,००० रुपये ८४ रु. १५१ रु. ५८२ रु.
३,००० रुपये १२६ रु. २२६ रु. ८७३ रु.
५,००० रुपये २१० रु. ३७६ रु. १,४५४ रु.
योजना लोकप्रिय का आहे?
अल्प गुंतवणूक : कमी मासिक हप्त्यामुळे गृहिणींनाही ही योजना परवडणारी आहे.
सुरक्षित भविष्य : नियमित उत्पन्न नसले तरी भविष्यातील पेन्शनची खात्री मिळते.
कुटुंबाचा आधार : खातेदार व जोदीदाराच्या निधनानंतर वारसाला पूर्ण रक्कम परत मिळते.
महिलांचा हा वाढता सहभाग केवळ आर्थिक साक्षरता दर्शवत नाही, तर ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने पडलेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
