ॲड. अशोक सोनी, कायदेतज्ज्ञ, परभणी
मृत्युपत्र हा एक अत्यंत महत्त्वाचा, संवेदनशील कायदेशीर दस्तऐवज आहे. योग्य पद्धतीने तयार केलेले मृत्युपत्र वारसामधील वाद टाळते आणि मालमत्तेचे नियोजन सोपे करते. त्यामुळे मृत्युपत्र करताना कायद्याने घालून दिलेल्या सर्व अटींचे पालन करणे आवश्यक आहे. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात असताना आपल्या संपत्तीचे, हक्काचे आणि मालमत्तेचे वाटप मृत्यूनंतर कोणाला आणि कशा प्रकारे मिळते, हे स्पष्ट करण्यासाठी मृत्युपत्र तयार करते. कायद्यानुसार मृत्युपत्राचे स्वरूप, अटी, सिद्धता आणि त्याचे परिणाम प्रामुख्याने इंडियन सक्सेशन ॲक्ट १९२५ आणि पुराव्याच्या दृष्टीने इंडियन इव्हिडन्स ॲक्ट १८७२ यामध्ये नमूद केलेले आहेत. नोंदणी नसेल तर अधिकारी अतिरिक्त पुरावे मागू शकतात, इतर वारसांची हरकत येऊ शकते, काही वेळा न्यायालयाचा आदेश आवश्यक ठरतो.
मृत्युपत्र म्हणजे काय?
मृत्युपत्र म्हणजे व्यक्तीने स्वत:च्या मृत्यूनंतर त्याच्या मालमत्तेचे वाटप कसे व्हावे, याबाबत केलेली कायदेशीर घोषणा (लीगल डिक्लेरेशन) होय. मृत्युपत्राला इंग्रजीत विल किंवा टेस्टामेंट असे म्हणतात. मृत्युपत्राची सर्वांत महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे
१. ते मृत्यूनंतर लागू होते.
२. ते बदलता किंवा रद्द करता येते.
३. ते स्वेच्छेने करणे आवश्यक असते.
मृत्युपत्राची न्यायालयात सिद्धता कशी केली जाते?
मृत्युपत्र न्यायालयात सिद्ध करताना पुढील बाबी महत्त्वाच्या असतात.
- वसीयतकर्त्याची सही अंगठा
- दोन साक्षीदारांची सही
- कमीत कमी एका साक्षीदाराची न्यायालयात साक्ष
- वसीयतकर्त्याची मृत्युपत्र लिहून ठेवताना शुद्ध मन:स्थिती असणे.
- मृत्युपत्र स्वेच्छेने केलेले असणे.
संशयास्पद परिस्थिती
- मृत्युपत्र न्यायालयात सिद्ध करताना पुढील बाबी महत्त्वाच्या असतात, वसीयतकर्त्याची सही अंगठा, दोन साक्षीदारांची सही, एका साक्षीदाराची न्यायालयात साक्ष.
- वसीयतकर्त्याची मृत्युपत्र लिहून ठेवताना शुद्ध मन:स्थिती असणे, मृत्युपत्र स्वेच्छेने केलेले असणे, संशयास्पद परिस्थिती.
मृत्युपत्राचा अधिकार कुणाला?
- ती १८ वर्षांपेक्षा जास्त वयाची असावी, ती शुद्ध मन:स्थितीत असावी. ती स्वेच्छेने मृत्युपत्र करत असावी, जर मृत्युपत्र दबाव, फसवणुकीमध्ये केले गेले असेल तर ते अमान्य होऊ शकते.
- मृत्युपत्र असेल तर मालमत्तेचे स्पष्ट वाटप होते. वारसांत वाद कमी होतात. संपत्ती इच्छेनुसार देता येते. कायदेशीर प्रक्रिया सोपी होते.
मृत्युपत्राचे प्रकार काय?
- स्वहस्ताक्षरातील मृत्युपत्र (होलोग्राफिक विल) : जे मृत्युपत्र वसीयतकर्त्याने स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिलेले असते त्याला स्वहस्ताक्षरातील मृत्युपत्र वसीयत म्हणतात. अशा मृत्युपत्राला न्यायालयात सहसा अधिक विश्वास दिला जातो.
- नोंदणीकृत मृत्युपत्र : मृत्युपत्र नोंदणी कार्यालयात नोंदवलेले असल्यास ते नोंदणीकृत असते.
- नोंदणी न केलेले मृत्युपत्र : मृत्युपत्र नोंदणी न केलेले असले तरी ते कायद्याने वैध असू शकते. मृत्युपत्र नोंदणीच्या कायद्यानुसार नोंदणी करणे अनिवार्य नाही; परंतु नोंदणीमुळे मृत्युपत्रास बळकटी मिळते व त्याबद्दल शंका घेतल्यास वा उत्पन्न झाल्यास त्याचे निरसन करणे सोपे जाते. नोंदणीकृत दस्तऐवजास प्राधान्य दिले जाते कारण त्याला साक्षीच्या कायद्यामध्ये प्रीझमशन आहे.
मृत्युपत्राच्या आवश्यक अटी काय आहेत?
- इंडियन सक्सेशन ॲक्टच्या कलम ६३ नुसार मृत्युपत्र वैध ठरण्यासाठी खालील अटी आवश्यक आहेत.
- सही किंवा अंगठा : मृत्युपत्रावर वसीयतकर्त्याची सही किंवा अंगठा असणे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे ते वैध ठरू शकते.
- दोन साक्षीदार : मृत्युपत्रावर किमान दोन सक्षम साक्षीदारांनी सही केलेली असावी, त्यांना कायद्याच्या भाषेत अटेस्टिंग विटनेस संबोधतात.
- साक्षीदारांची उपस्थिती : दोन्ही साक्षीदारानी वसीयतकर्त्यांनी सही करताना पाहिलेले असणे आवश्यक आहे, तसेच प्रत्येक साक्षीदाराने मृत्युपत्रावर सही करताना वसीयतकर्ता व दुसऱ्या साक्षीदाराने पाहिलेले असणे गरजेचे आहे.
मृत्युपत्र रद्द किंवा बदलता येते का?
वसीयतकर्ता कधीही मृत्युपत्र बदलू किंवा रद्द करू शकतो. हे खालील प्रकारे करता येते, नवीन मृत्युपत्र तयार करणे, लिखित रद्द करणे, मूळ मृत्युपत्र नष्ट करणे, नोंदणीकृत मृत्युपत्र असल्यास ते रद्द करण्यासाठी नोंदणीकृत दस्तऐवजाने करावे लागते.
न्यायालय मृत्युपत्र तपासताना काय पाहते?
नैसर्गिक वारसांना पूर्णपणे वगळणे, लाभार्थी व्यक्तीने मृत्युपत्र तयार करण्यात सक्रिय भूमिका घेणे, वसीयतकर्त्याची मानसिक स्थिती संदिग्ध असणे, अशा परिस्थितीत मृत्युपत्र सादर करणाऱ्या व्यक्तीने त्या शंका दूर करणे आवश्यक असते.
