आपल्या पश्चात मालमत्तेचे वाटप कसे व्हावे, यासाठी अनेकदा पालक साध्या कागदावर हाताने लिहून (हस्तलिखित टिपण) त्यावर स्वाक्षरी करतात. पण, असे मृत्युपत्र कायदेशीरदृष्ट्या वैध असते का, असा प्रश्न अनेकांना पडतो. भारतीय वारसा कायद्यातील तरतुदीनुसार याचे उत्तर धक्कादायक ठरू शकते. जर मृत्युपत्रावर साक्षीदारांच्या सह्या नसतील तर तश मृत्यूपत्राला न्यायालयात केराची टोपली दाखवली जाऊ शकते. त्यामुळे मृत्यूपत्र तयार करताना काळजी घ्या...
केवळ स्वाक्षरी पुरेशी नाही!
एखादे मृत्युपत्र कायदेशीररीत्या वैध ठरण्यासाठी मालमत्ताधारकाची स्वाक्षरी असून चालत नाही. त्या कागदावर किमान दोन साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्या अनिवार्य आहेत. तुमच्या आई-वडिलांनी साध्या कागदावर सर्व इच्छा लिहिल्या असतील आणि त्यावर त्यांची सही असेल, मात्र जर त्यावर दोन साक्षीदारांनी साक्ष म्हणून सह्या केल्या नसतील, तर तो कागद कायद्याच्या दृष्टीने 'मृत्युपत्र' मानला जात नाही.
सरकारी नोंदणीची सक्ती नाही
मृत्युपत्रासाठी कोणत्याही महागड्या स्टॅम्प पेपरची वा सरकारी नोंदणीची सक्ती नाही. साध्या कागदावर केलेले मृत्युपत्रही पूर्णपणे वैध असते, मात्र त्याला साक्षीदारांची जोड हवी. जर तुमच्या पालकांनी एखादे साधे टिपण (रफ नोट) किंवा अनोंदणीकृत कागद मागे सोडला असेल आणि त्यावर साक्षीदारांच्या सह्या नसतील, तर कायद्याच्या भाषेत त्यांनी 'मृत्युपत्र केलेच नाही'
मृत्युपत्र अवैध; मालमत्तेचे काय?
मृत्युपत्र अवैध ठरल्यास मृत व्यक्तीच्या मालमत्तेचे वाटप मृताच्या इच्छेनुसार होत नाही. त्याऐवजी तो ज्या धर्माचा असेल, त्या धर्माच्या कायद्यानुसार सर्व कायदेशीर वारसांमध्ये समान पद्धतीने मालमत्तेचे वाटत केले जाते. त्यामुळे, आपल्या पश्चात कौटुंबिक वाद टाळायचे असतील, तर मृत्युपत्रावर दोन विश्वासार्ह साक्षीदारांच्या सह्या असल्याची खात्री करणे हाच सर्वात सुरक्षित मार्ग आहे.
हस्तलिखित ‘मृत्युपत्र’ कायदेशीर ठरू शकते, मात्र त्यासाठी काही अटी आहेत. मृत्युपत्र लिहिताना व्यक्तीची स्वेच्छा असावी आणि किमान दोन साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्या असणे आवश्यक आहे. सरकारी नोंदणी बंधनकारक नसली तरी ती सुरक्षित ठरते.
