सोशल मीडियावर अनेकदा अशा गोष्टी व्हायरल होतात ज्यांचा सत्याशी दुरूनही संबंध नसतो. मात्र, मोठ्या प्रमाणात शेअर झाल्यामुळे अशा पोस्ट लोकांमधे संभ्रम निर्माण करतात. सध्या अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की मार्च २०२६ पासून एटीएममधून ५०० रुपयांच्या नोटा काढता येणार नाहीत. व्हायरल पोस्टमध्ये असाही दावा केला आहे की,रिझर्व्ह बँक (RBI) यांच्या वितरणावर बंदी घालत आहे आणि मार्च २०२६ पासून ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर होतील.
काय आहे सत्य?
पीआयबीच्या (PIB) फॅक्ट चेक टीमने स्पष्ट केलंय की, अशा प्रकारच्या व्हायरल पोस्ट पूर्णपणे दिशाभूल करणाऱ्या आणि खोट्या आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. पीआयबीच्या टीमनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर याबद्दलची माहिती दिली आहे.
पीआयबी टीमनं काय म्हटलंय?
५०० रुपयांच्या नोटांवर रिझर्व्ह बँकेनं कोणतीही बंदी घातलेली नाही.
या नोटा चलनातून बाहेर करण्यात आलेल्या नाहीत.
नागरिक या नोटांचा वापर पूर्वीप्रमाणेच करत राहू शकतात.
पीआयबीनं दिशाभूल न करुन घेता त्या अधिक शेअर न करण्याचं आवाहन केलं आहे.
RBI to stop ₹500 notes from ATMs by March 2026❓🤔
— PIB Fact Check (@PIBFactCheck) January 2, 2026
Some social media posts claim that the Reserve Bank of India will discontinue the circulation of ₹500 notes by March 2026.#PIBFactCheck:
❌This claim is #fake!
✅ @RBI has made NO such announcement.
✅ ₹500 notes have… pic.twitter.com/F0Y3t0wHSf
यापूर्वीही झाले आहेत असे दावे
५०० रुपयांच्या नोटांबाबत अशा अफवा पसरण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा ५०० रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याबाबतच्या भ्रामक चर्चांनी जोर धरला होता. त्यामुळे सोशल मीडियावर अशी कोणतीही पोस्ट समोर आल्यास तिची खातरजमा करणं अत्यंत आवश्यक आहे.
एटीएममध्ये मिळतात प्रामुख्याने ५०० च्या नोटा
बहुतेक एटीएममध्ये ५०० रुपयांच्या नोटाच अधिक प्रमाणात उपलब्ध असतात. काही एटीएममध्ये १०० आणि २०० रुपयांच्या नोटाही असतात. अशा परिस्थितीत जर सरकारनं खरोखरच असा कोणताही निर्णय घेतला, तर लोकांसमोर अचानक मोठी समस्या उभी राहू शकते. मात्र, सध्या असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
