गेल्या काही काळापासून देशातील तिसऱ्या क्रमांकाची दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडिया (VodafoneIdea) तोट्यात जात आहे. दरम्यान, आता व्होडाफोन आयडियाच्या संचालक मंडळान २० हजार कोटी रुपये उभारण्यासाठी मंजुरी दिली आहे. मार्च तिमाहीत कंपनीचा निव्वळ तोटा ६,६०९ कोटी रुपयांनी वाढून ७,१६६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनी सातत्यानं आपले ग्राहक गमावत आहे. कंपनी या नवीन फंडाच्या माध्यमातून ४जी आणि ५जी चा विस्तार करणार आहे. याचा परिणाम कंपनीच्या व्यवसायाच्या सद्यस्थितीवर होऊ शकतो आणि ग्राहकांना पुन्हा परत आणता येऊ शकतं. इक्विटी, डेट किंवा अन्य कोणत्याही मार्गानं पैसे उभे करावेत की नाही याचा विचार केला जात असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.
सातत्यानं ग्राहक होताहेत कमी
ब्रिटनचा व्होडाफोन ग्रुप पीएलसी आणि भारतातील आदित्य बिर्ला ग्रुप यांच्या संयुक्त उपक्रमामुळे दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये ५ जी सेवा देऊनही ग्राहकांची कमी होणारी संख्या रोखता आलेली नाही. २०१९ मध्ये विलीनीकरणानंतर डिसेंबरमध्ये प्रथमच ग्राहकांची संख्या २० कोटींच्या खाली आली. मार्च महिन्यात एकदा कंपनीच्या ग्राहकांची संख्या कमी होऊन १९८.२० मिलियन झाली होती.
ट्रम्प यांनी 'या' क्षेत्रावर लावलं ५०% टक्के टॅरिफ, भारताच्या या कंपन्यांवर होणार निर्णयाचा परिणाम
व्हीआयचे ऑडिटर्स SR Batliboy and Associates यांनी कंपनीच्या आर्थिक परिस्थितीचा परिणाम रोख रकमेच्या प्रवाहावर झाला असल्याचा इशारा दिलाय. मात्र, याउलट कंपनीचे टॉप मॅनेजमेंट निकालाबाबत उत्साही आहे. ग्राहक गमावण्याचा वेग कमी झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तसंच, प्रति युजर रेव्हेन्यूमध्येही सुधारणा झाल्याचं त्यांनी सांगितलं.
व्हीआयनं या तिमाहीत दिल्ली एनसीआर, मुंबई, चंदीगड आणि पाटणा येथे ५ जी सेवा सुरू केली आहे. आता ज्या १७ सर्कलमध्ये ५जी एअरवेज आहेत तिथे ही सेवा सुरू करण्याची कंपनीची योजना आहे. मात्र, रिलायन्स जिओ आणि एअरटेलनं बाजारात ज्याप्रकारे आपले पाय रोवले आहेत, त्याप्रकारे व्होडाफोन आयडियाला शिरकाव करण्यात अडचणींचा सामना करावा लागणार आहे.