RBI Policy: रिझर्व्ह बँकेनं सर्वसामान्यांना पुन्हा एकदा दिलासा देत ईएमआयचा भार कमी केला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात ५० बेसिस पॉईट्सची कपात करण्याची घोषणा केली. यानंतर आता रेपो दर ५.५० टक्क्यांवर आलाय. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सलग तिसऱ्यांदा रेपो दरात कपात करुन सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान, रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीपूर्वी तज्ज्ञांनी रेपो दरात कपातीची शक्यता वर्तवली होती. यानंतर ग्राहकांवरी ईएमआयचा बोजा कमी होणार आहे.
ऑगस्टच्या बैठकीतही हा कल कायम राहण्याची शक्यता आहे, असं मत यापूर्वी तज्ज्ञांनी व्यक्त केलं होतं. आता या दर कपातीनंतर ५० आणि २० लाख रुपयांच्या कर्जावर महिन्याला किती रुपयांची बचत होईल हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
५० लाखांवर किती कमी होणार EMI?
समजा तुम्ही ३० वर्षांसाठी बँकेकडून ५० लाखांचे गृहकर्ज घेतलं असेल आणि त्यावर तुम्ही ९ टक्के व्याज देत असाल तर तुमचा मासिक ईएमआय ४०,२३१ रुपये होईल. रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात ५० बेसिस पॉईंटची कपात केल्यानंतर हा ईएमआय ३८,४४६ रुपयांवर येणार आहे. म्हणजेच मासिक ईएमआयमध्ये जवळपास २००० रुपयांची बचत होऊ शकते. मात्र, आरबीआयचा रेपो रेट कमी केल्यानंतर तुमच्या बँकेनंही कर्जाच्या व्याजदरातही करणं गरजेचं आहे. याचा परिणाम वाहन कर्ज आणि इतर कर्जावरही होऊ शकतो.
२० लाखांवर किती होईल EMI?
जर तुम्ही २० वर्षांसाठी २० लाखांचं कर्ज घेतले असेल आणि रेपो रेट ५० बेसिस पॉईंटनं कमी झाल्यानंतर तुमची बँक कर्जाच्या व्याजातही कपात करत असेल तर तुमचा ईएमआय कमी होईल. समजा २० लाखांचं कर्ज ९ टक्के व्याजदरानं २० वर्षांसाठी घेतलं तर मासिक ईएमआय १७,९९५ रुपये असेल. आता ५० बेसिस पॉईंटनं कपात झाल्यानंतर तुमच्या कर्जाचा ईएमआय १७,३५६ रुपये होईल.