Microsoft Investment: अमेरिकन टेक जायंट मायक्रोसॉफ्टने ग्लोबल साउथसाठी मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. भारतात आयोजित AI Impact Summit 2026 निमित्त भारत दौऱ्यावर आलेले मायक्रोसॉफ्टचे उपाध्यक्ष ब्रॅड स्मिथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या दरम्यान कंपनीने २०३० पर्यंत AI-संबंधित पायाभूत सुविधा (इन्फ्रा) आणि कौशल्य विकासासाठी सुमारे ५० अब्ज डॉलर्स गुंतवणूक करण्याचा निर्णय जाहीर केला.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
सुमारे ₹४ लाख कोटींची गुंतवणूक...
AI समिटमध्ये बोलताना ब्रॅड स्मिथ म्हणाले, आज AI चे फायदे जगभर समानरीत्या पोहोचलेले नाहीत. काही देशांमध्ये AI झपाट्याने वाढतो आहे, तर अनेक ठिकाणी त्याची पोहोच अजूनही मर्यादित आहे. मायक्रोसॉफ्टचा उद्देश AI केवळ मोठ्या देशांपुरता किंवा मोठ्या कंपन्यांपुरता मर्यादित न ठेवता सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आहे.
ग्लोबल साउथमध्ये मोठी संधी
ब्रॅड स्मिथ यांच्या मते, भारत, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका यांसारख्या ग्लोबल साउथ देशांमध्ये AI साठी मोठी संधी आहे. येथे टॅलेंट उपलब्ध आहे, मोठ्या प्रमाणावर यूजर्स आहेत. मात्र, योग्य पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षणाशिवाय AI चा पूर्ण लाभ मिळू शकत नाही, असे त्यांनी नमूद केले.
डेटा सेंटर्स, क्लाउड इन्फ्रा आणि स्किल डेव्हलपमेंटवर भर
मायक्रोसॉफ्टची ही गुंतवणूक मुख्यत्वे AI डेटा सेंटर्स, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर, स्थानिक पातळीवरील AI स्किल ट्रेनिंग यावर केंद्रित असेल. याशिवाय, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना AI शी जोडण्याची योजना असून, भविष्यात अधिकाधिक लोक AI टूल्सचा प्रभावी वापर करू शकतील, असा कंपनीचा उद्देश आहे.
भारत AI ग्रोथ हब
मायक्रोसॉफ्टने स्पष्ट केले की, भारत हा केवळ मोठा बाजार नाही, तर AI वाढीचे महत्त्वाचे केंद्र आहे. कंपनी आधीपासूनच भारतात क्लाउड आणि AI पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करत आहे. नव्या घोषणेमुळे डेटा सेंटर्स, ट्रेनिंग प्रोग्राम्स, AI-आधारित स्टार्टअप्स यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
AI चा वापर ‘प्रॉफिट’पुरता मर्यादित नको
समिटमध्ये यावरही भर देण्यात आला की, सरकार स्टार्टअप्स आणि मोठ्या टेक कंपन्यांनी एकत्र काम करणे गरजेचे आहे, जेणेकरून AI चा वापर केवळ नफा कमावण्यासाठी नव्हे, तर सामान्य लोकांचे जीवन सुकर करण्यासाठी होईल.
गुगलचाही मोठा प्लॅन
AI Impact Summit दरम्यान गुगलचे CEO सुंदर पिचाई यांनीही भारतात पुढील पाच वर्षांत 15 अब्ज डॉलर गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ही गुंतवणूक प्रामुख्याने डेटा सेंटर्स उभारण्यासाठी असेल, ज्यामुळे AI आणि इतर तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना मिळेल. याचा लाभ भारतासह इतर देशांनाही होणार आहे.
भारतात वाढती गुंतवणूक: कारण काय?
तज्ज्ञांच्या मते, भारतात मोठ्या टेक कंपन्यांच्या गुंतवणुकीमागे स्पष्ट कारणे आहेत. जगातील सर्वाधिक लोकसंख्या, डिजिटल प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेसचा मोठा वापर आणि भारतीय यूजर्सकडून मोठ्या प्रमाणावर महसूल यामुळे भारत सध्या जागतिक टेक कंपन्यांसाठी एक मोठा डेटा मार्केट बनत चालला आहे.
