लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ७३ टक्के कर्मचाऱ्यांना यावर्षी नोकरी टिकवण्याचा विश्वास असून, तो मागील वर्षीच्या तुलनेत ११ टक्क्यांनी जास्त आहे. टियर-१ शहरांतील ३१ टक्के कर्मचारी नोकरी टिकवण्याबद्दल ‘अत्यंत आत्मविश्वासाने’ बोलत असताना टियर-२ शहरांमध्ये ही संख्या फक्त १८ टक्के आहे.
५,००० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या कंपन्यांतील ८५ टक्के कर्मचाऱ्यांना नोकरी टिकविण्याचा आत्मविश्वास आहे, तर ५० किंवा त्याहून कमी कर्मचाऱ्यांच्या कंपन्यांमध्ये ही टक्केवारी ५८ टक्के असल्याचे एका नव्या अहवालात समोर आले आहे. उच्च शिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षणातील आघाडीची ग्लोबल एडटेक कंपनी ग्रेट लर्निंगने त्यांच्या वार्षिक ‘अपस्किलिंग ट्रेण्ड्स रिपोर्ट २०२५-२६’चा चौथा भाग प्रकाशित केला आहे. यात देशातील अनेकांना सहभागी करून घेण्यात आले.
आकडेवारी नेमकी काय सांगते?
३७% कर्मचारी म्हणतात की, ऑफिसमधील कामामुळे नवीन कौशल्ये शिकायला वेळ मिळत नाही.
२७% लहान शहरातील कर्मचाऱ्यांमध्ये प्रमोशन मिळवण्यासाठी अपस्किलिंगचे प्रयत्न केले जात आहेत.
२५% महिलांना कौटुंबिक जबाबदाऱ्या अडथळा वाटतो, तर पुरुषांमध्ये ही टक्केवारी २०% आहे.
२३% कर्मचारी नवीन कौशल्ये गरज म्हणून शिकत आहेत.
१५% कर्मचारी प्रमोशन मिळण्यासाठी अपस्किलिंग करत आहेत.
८% कमी अनुभव असलेल्यांना अपस्किलिंगचा खर्च परवडेना.
एआयचा धोका कुणाला?
एआय बदलाला कर्मचारी सहज सामोरे जात आहेत. ७८ % कर्मचाऱ्यांना एआयचा त्यांच्या करिअरवर सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास आहे. एमबीए (८९ टक्के) आणि बीकॉम (८४%) पदवीधारक अधिक आशावादी आहेत.
पगारवाढ हवी तर...
सर्व वयोगटांत पगारवाढ ही अपस्किलिंगमागची सर्वांत मोठी प्रेरणा ठरली. ८५ % कर्मचारी करिअर सुरक्षित ठेवण्यासाठी कौशल्ये शिकत आहेत.
मास्टर्स डिग्री नको, मग...
या वर्षी मास्टर्स डिग्रीऐवजी अल्पकालीन सर्टिफिकेट कोर्सेसला प्राधान्य दिले जात असून, ते अधिक स्वस्त, जलद आणि उद्दिष्ट्यपूर्ण ठरते, असे कर्मचारी म्हणत आहेत.