Unemployment Rate : देशात रोजगाराची स्थिती पुन्हा एकदा चिंताजनक बनली आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (MoSPI) सोमवारी जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, मे २०२५ मध्ये देशातील बेरोजगारीचा दर ५.६ टक्क्यांवर पोहोचला आहे, जो एप्रिलमध्ये ५.१ टक्के होता. बेरोजगारीतील ही वाढ ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांमध्ये दिसून आली असून, विशेषतः तरुणांना आणि महिलांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे.
तरुणांमध्ये बेरोजगारीचा उच्चांक
मे महिन्यात, १५-२९ वयोगटातील तरुणांमध्ये बेरोजगारीचा दर राष्ट्रीय स्तरावर १५% वर पोहोचला, जो एप्रिलमध्ये १३.८% होता. शहरी भागातील तरुणांची बेरोजगारी १७.९% झाली (एप्रिलमध्ये १७.२% होती), तर ग्रामीण भागात ती १३.७% पर्यंत वाढली (एप्रिलमध्ये १२.३% होती). या आकडेवारीवरून तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी किती संघर्ष करावा लागत आहे, हे स्पष्ट होते.
महिलांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त बेरोजगारी
पुरुष आणि महिला दोघांसाठीही बेरोजगारी वाढली असली, तरी मे महिन्यात महिलांमध्ये बेरोजगारीचा दर पुरुषांपेक्षा जास्त नोंदवला गेला. मे महिन्यात महिलांचा बेरोजगारीचा दर ५.८% होता, तर पुरुषांसाठी तो ५.६% होता. कामाच्या ठिकाणी महिलांचा सहभाग (WPR - Work Population Ratio) देखील कमी झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.
शहरी आणि ग्रामीण दोन्हीकडे वाढ
बेरोजगारीतील वाढ केवळ एकाच भागापुरती मर्यादित नाही. शहरी भागात बेरोजगारीचा दर मे महिन्यात १७.९ टक्क्यांवर पोहोचला, तर ग्रामीण भागात तो १३.७ टक्क्यांवर पोहोचला आहे. याचा अर्थ, दोन्ही ठिकाणी रोजगाराच्या संधींची कमतरता जाणवत आहे.
काम करणाऱ्यांची संख्याही घटली
केवळ बेरोजगारीचा दर वाढला नाही, तर देशात काम करणाऱ्या लोकांची संख्या देखील कमी झाली आहे. कामगार शक्ती सहभाग दर (LFPR - Labour Force Participation Rate) आणि कामगार लोकसंख्या प्रमाण (WPR - Work Population Ratio) दोन्हीमध्ये घट दिसून आली आहे. याचा अर्थ, कामाच्या शोधात असलेल्या किंवा काम करणाऱ्या लोकांचे एकूण लोकसंख्येशी असलेले प्रमाण घटले आहे.
बेरोजगारी वाढीमागे 'हे' आहेत प्रमुख कारणं
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने बेरोजगारीतील या वाढीमामागे काही प्रमुख कारणे दिली आहेत.
- हंगामी बदल: रब्बी पिकांचा हंगाम संपल्यामुळे शेतीतल्या नोकऱ्यांमध्ये तात्पुरती घट झाली. याचा परिणाम पुरुष आणि महिला दोघांच्याही रोजगारावर झाला.
- उष्णतेची लाट: मे महिन्यात देशातील अनेक भागांमध्ये तापमान खूप जास्त होते. यामुळे बाहेरच्या कामांवर परिणाम झाला, ज्यामुळे रोजगार घटला.
वाचा - ३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
या आकडेवारीवरून सध्याच्या आर्थिक परिस्थितीत रोजगाराच्या आघाडीवर आव्हाने वाढत असल्याचे स्पष्ट होते.