भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात नुकत्याच झालेल्या ऐतिहासिक 'मुक्त व्यापार करारा'मुळे दक्षिण आशियातील भू-राजकीय आणि आर्थिक समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. भारतासाठी हा करार 'मदर ऑफ ऑल डील्स' ठरत असतानाच, पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर मात्र याचे अत्यंत भीषण परिणाम होताना दिसत आहेत. या करारामुळे पाकिस्तानला दरवर्षी अब्जावधी डॉलर्सचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आतापर्यंत भारतीय कापड आणि तयार कपड्यांवर युरोपीय बाजारपेठेत १२% आयात शुल्क लावले जात होते. मात्र, नवीन करारानुसार हे शुल्क आता शून्य होणार आहे. यामुळे भारतीय उत्पादने युरोपमध्ये स्वस्त होतील आणि त्यांची मागणी प्रचंड वाढेल.
पाकिस्तानला का बसलाय धक्का?
पाकिस्तानची जवळपास ९ अब्ज डॉलरची निर्यात युरोपला होते. यात सर्वाधिक वाटा कापड उद्योगाचा आहे. भारताला शुल्क माफी मिळाल्याने आता पाकिस्तानी कापडाला युरोपमध्ये कोणीही विचारणार नाही. पाकिस्तानच्या कापड उद्योगावर सुमारे १ कोटी लोकांचे उदरनिर्वाह अवलंबून आहेत. निर्यात घटल्यास या सर्वांच्या नोकऱ्यांवर गदा येणार असल्याचे मत पाकिस्तानचे माजी वाणिज्य मंत्री डॉ. गोहर इजाज यांनी व्यक्त केले आहे. तसेच पाकिस्तानला आतापर्यंत 'GSP Plus' अंतर्गत युरोपमध्ये विशेष सवलत मिळत होती, जी भारताला मिळत नव्हती. आता भारतालाही तीच सवलत मिळाल्याने पाकिस्तानची मक्तेदारी संपुष्टात आली आहे.
पाकिस्तानमध्ये 'पॅनिक मोड'
या निर्णयामुळे पाकिस्तान सरकारमध्ये खळबळ माजली आहे. उपपंतप्रधान इशाक डार यांनी तातडीची बैठक बोलावून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. "भारताचा हा आर्थिक विजय आमच्यासाठी धोक्याची घंटा आहे," अशी कबुली पाकिस्तानी माध्यमांकडून दिली जात आहे.
