नवी दिल्ली - बँकेचे कर्ज थकले की वसुलीसाठी येणारे धमकीचे फोन आणि रिकव्हरी एजंट्सचा जाच आता लवकरच थांबणार आहे. रिझर्व्ह बँकेने कर्जवसुली संदर्भात कडक नियमावलीचा मसुदा गुरुवारी प्रसिद्ध केला. यानुसार, वसुली एजंटने ग्राहकांशी सभ्य भाषेत बोलणे आणि सर्व कॉल रेकॉर्ड करणे बंधनकारक असणार आहे.
काही काळापूर्वी बिहारमध्ये वसुली एजंटच्या त्रासाने कर्जदाराच्या नातेवाईकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी गेल्या आठवड्यात पतधोरण जाहीर करताना कडक पावले उचलण्याचे संकेत दिले. त्यानुसार ही नवी नियमावली जाहीर केली.
नेमके काय बदलणार?
एजंटांनी सभ्य, सुसंस्कृत आणि मर्यादित वर्तन राखणे आवश्यक
अपमानास्पद भाषा, धमकीचे संदेश, अयोग्य वेळेला भेटी यावर थेट बंदी
एजंट व त्यांच्या कर्मचाऱ्यांची पूर्वतपासणी अनिवार्य
कर्जविषयक प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत असल्यास सावधगिरीची अट.
ग्राहकांची खासगी माहिती एजंटकडून गैरकामासाठी वापरली जाणार नाही, याची जबाबदारी बँकांना घ्यावी लागेल.
संवेदनशील प्रसंगी वसुली टाळा : घरातील मृत्यू, नैसर्गिक आपत्ती, लग्नसमारंभ किंवा सणासुदीच्या काळात वसुलीची कारवाई करू नये, असा स्पष्ट निर्देश मसुद्यात आहेत. ‘अयोग्य प्रसंगी’ वसुली टाळण्यावर भर देण्यात आला आहे.
...तर बँकांवर होणार कारवाई : बँकांनी एजंटांकडे असलेली ग्राहकांची माहिती सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी स्वीकारावी लागेल. माहितीचा गैरवापर झाल्यास बँकांवर कारवाई होऊ शकते.
न्यायप्रविष्ट प्रकरणांत सावधगिरी : न्यायालयात सुनावणी सुरू असलेली कर्ज प्रकरणे वसुली एजंटकडे सोपविताना बँकांना सावधगिरी बाळगावी लागेल, असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे.
