Ex-HCL CEO Message: बोर्ड परीक्षेच्या तणावाच्या वातावरणात 'संपर्क फाउंडेशन'चे संस्थापक आणि 'एचसीएल टेक्नॉलॉजीज'चे माजी सीईओ विनीत नायर यांनी विद्यार्थ्यांना एक हृदयस्पर्शी संदेश दिलाय. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर स्वतःची मार्कशीट शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. गुण तुमचं भविष्य ठरवू शकत नाहीत, याची आठवण विनीत यांनी या पोस्टद्वारे विद्यार्थ्यांना करून दिली.
बोर्ड परीक्षा आयुष्य ठरवत असत्या, तर अर्धे सीईओ आज बेरोजगार असते, असं लिहीत त्यांनी हा विचार मनावर ठसवण्याचं आवाहन केलंय. बोर्डाच्या परीक्षा महत्त्वाच्या आहेत, हे मान्य करतानाच त्यांनी विद्यार्थ्यांना सावध केलंय की, यश मोजण्याचे हे काही अंतिम परिमाण नाही. बोर्ड महत्त्वाचे आहेत, पण ते तुमचे नशीब ठरवू शकत नाहीत, असं नायर यांनी स्पष्ट केलं.
IF BOARD EXAMS DECIDED LIFE, HALF THE CEOs WOULD BE UNEMPLOYED
— Vineet Nayar (@vineetnayar) February 13, 2026
Let that sink in.
Boards are important.
But they are not your destiny.
At 17, I walked out of my Chemistry exam knowing I had messed it up.
Full panic mode.
A cousin looked at me and asked,
“Will you die if you… pic.twitter.com/FED0Cmi90q
भीतीवर केली मात
विनीत नायर यांनी आपल्या किशोरवयीन काळातील एक अनुभव शेअर केला आहे. कठीण पेपरनंतर अनेक विद्यार्थ्यांना वाटणारी भीती त्यांनी स्वतः अनुभवली होती. वयाच्या १७ व्या वर्षी केमिस्ट्रीचा पेपर देऊन बाहेर पडताना आपल्याला खूप कमी गुण मिळतील, असं वाटल्याने ते प्रचंड घाबरले होते. मात्र, त्यानंतर घडलेल्या एका प्रसंगाने त्यांचा दृष्टिकोन बदलून टाकला. त्यांच्या चुलत भावानं त्यांची अवस्था पाहून विचारले की, 'जर तू नापास झालास तर मरशील का?' जेव्हा नायर यांनी 'नाही' असं उत्तर दिले, तेव्हा भावानं पुन्हा विचारलं की, 'मग तू या परिस्थितीला जीवन-मरणाचा प्रश्न का मानतोयस?' या साध्या संवादानं नायर यांना वास्तवाचं भान करून दिलं आणि पुढच्या परीक्षेला घाबरत जाण्याऐवजी त्यांनी शांत राहण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांनंतर विनीत यांनी शांत डोक्यानं गणिताचा पेपर दिला आणि त्यात त्यांनी कमाल केली.
परीक्षेपेक्षा आयुष्याची व्याप्ती मोठी
त्या अनुभवातून मिळालेल्या धड्याचा वापर करत नायर यांनी शैक्षणिक चाचणी आणि खऱ्या जगातील आव्हानं यातील फरक स्पष्ट केला आहे. त्यांच्या मते, परीक्षा तुमच्या स्मरणशक्तीची चाचणी घेतात, पण आयुष्य तुमच्या धैर्याची चाचणी घेते. विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की बोर्ड परीक्षा हा एका मोठ्या प्रवासाचा फक्त एक टप्पा आहे. बोर्डाची परीक्षा म्हणजे खेळाची केवळ एक लेव्हल आहे, संपूर्ण खेळ नाही, असं त्यांनी नमूद केलं. त्यांनी विद्यार्थ्यांना व्यावहारिक सल्ला दिला आहे की, पुरेशी झोप घ्या, कठोर परिश्रम करा, आपले सर्वोत्तम प्रयत्न करा आणि जे निकाल लागतील त्याचा स्वीकार करा, कारण आयुष्य एका परीक्षेपेक्षा खूप मोठे आहे.
भीतीला हरवण्याचे आवाहन
विनीत नायर यांनी विनोदी शैलीत विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात घरातील वातावरण हलकं ठेवण्याचा सल्ला दिला आहे. अधूनमधून 'बाबा, ऑम्लेट द्या... आणि मँगो शेक विसरू नका!' असे ओरडून घरातील ताण कमी करा, असं त्यांनी सुचवले आहे. आपल्या पोस्टचा शेवट करताना त्यांनी थेट विद्यार्थ्यांना संबोधित करत म्हटलं की, बोर्ड परीक्षेची ही भीती केवळ तुमच्या मनातील भीतीवर जगते, तिला उपाशी मारा! मित्रांनो, तुम्ही हे नक्कीच करू शकता, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
