ITR Aadhaar E-Verification: आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे, परंतु त्यानंतरही एक महत्त्वाचा टप्पा आहे ज्याकडे बरेच लोक दुर्लक्ष करतात आणि तो म्हणजे ई-व्हेरिफिकेशन. आयकर विभागाच्या नियमांनुसार, रिटर्न अपलोड केल्यानंतर ३० दिवसांच्या आत त्याची पडताळणी करणं आवश्यक आहे. जर ही प्रक्रिया वेळेवर झाली नाही, तर तुमचे रिटर्न अवैध घोषित केलं जाऊ शकतं, ज्यामुळे परतावा अडकू शकतो किंवा पुढे दंड देखील आकारला जाऊ शकतो.
ई-व्हेरिफिकेशन कसं कराल?
सर्वात सोपा मार्ग म्हणजे आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर येणारा ओटीपी.
- यासाठी incometax.gov.in पोर्टलवर जा
- लॉग इन करा आणि 'e-File' टॅबवर क्लिक करा
- 'Income Tax Return' निवडा आणि नंतर 'e-Verify Return' वर जा
- 'आधार ओटीपी' पर्याय निवडा
- तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP मिळेल, तो एंटर करा
- तुम्हाला पडताळणी पूर्ण झाल्याचा मेसेज आणि ट्रान्झॅक्शन आयडी मिळेल.
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
ई-व्हेरिफिकेशनसाठी इतर पर्याय
- नेट बँकिंगद्वारे
- प्री अप्रुव्ड बँक किंवा डीमॅट खातं
- एटीएम जनरेटेड कोडद्वारे
- डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट (डीएससी)
- या पर्यायांद्वारे तुम्ही कोणत्याही कागदपत्रांशिवाय रिटर्न पडताळू शकता.
फिजिकल फॉर्मद्वारे कसं कराल?
जर एखाद्या व्यक्तीला ई-व्हेरिफिकेशन करायचं नसेल, तर तो आयटीआर-व्ही फॉर्म डाउनलोड करू शकतो, त्यावर स्वाक्षरी करू शकतो आणि ३० दिवसांच्या आत तो बंगळुरू येथील आयकर विभागाच्या सीपीसी कार्यालयात पाठवू शकतो. परंतु या प्रक्रियेत जास्त वेळ लागतो आणि धोकाही कायम राहतो.
जर विलंब झाला तर काय करावं?
जर काही कारणास्तव तुम्ही ३० दिवसांच्या आत पडताळणी करू शकला नाहीत, तर तुम्हाला अर्ज करावा लागेल. विलंबाचं कारण यामध्ये द्यावं लागेल. जर विभागानं मान्यता दिली तर तुमचं रिटर्न वैध मानलं जाईल.