लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अमेरिकेने लादलेल्या जाचक आयात शुल्कामुळे (टॅरिफ) आधीच पोळलेल्या भारतीय निर्यातदारांनी आखाती (गल्फ) देशांचा आधार घेतला होता. मात्र, पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे आणि महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीतील वाढत्या अडथळ्यांमुळे भारताची हीच ‘पर्यायी बाजारपेठ’ धोक्यात आली आहे. आखाती देशांच्या मार्गावरील संकटांमुळे भारताच्या अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांना आता ‘दुहेरी फटका’ बसण्याची चिन्हे आहेत.
अमेरिकेकडे जाणाऱ्या उत्पादनांच्या निर्यातीमध्ये मोठी घसरण झाली आहे. सप्टेंबर-डिसेंबर २०२४ दरम्यान ७ अब्ज डॉलर असलेली निर्यात २०२५ मध्ये २.१ अब्ज डॉलरवर आली. यानंतर निर्यातदारांनी वेगाने गल्फ देशांकडे मोर्चा वळवला. या देशांकडे निर्यात ८५४ दशलक्ष डॉलरवरून १.७ अब्ज डॉलरपर्यंत वाढली. मात्र वाढता तणाव नव्या व्यापारमार्गावरच गदा आणत आहे.
‘बफर मार्केट’वरच संकट : व्यापारातील अनिश्चिततेत गल्फ देश भारतासाठी ‘बफर मार्केट’ ठरले. मात्र आता त्याच बाजारपेठेवर संकट ओढवल्याने निर्यातदारांसमोर पर्यायांची कमतरता निर्माण झाली आहे.
रोजगारावर परिणामाची भीती
ही उत्पादने निर्यातीपुरती मर्यादित नसून हिरे-दागिने, धातू, यंत्रसामग्री अशा रोजगाराधारित उद्योगांशी जोडलेली आहेत. त्यामुळे उत्पादन, पुरवठा साखळी व रोजगारावर मोठा परिणाम होऊ शकतो.
शेतकरी अडकला मोठ्या संकटात
शाल, मफलर आणि रेशीम कापडाच्या मोठ्या प्रमाणातील निर्यातीसाठी गल्फ बाजारपेठ महत्त्वाची आहे. भारताच्या केळी आणि वेलची यांसारख्या कृषी उत्पादनांची ७५% पेक्षा जास्त निर्यात या प्रदेशात होते.
कोणत्या उत्पादनांना सर्वाधिक फटका?
२०२५ मध्ये हिरे, दागिने आणि अभियांत्रिकी वस्तूंमध्ये मोठी वाढ नोंदली गेली होती. अमेरिकन बाजारपेठ गमावल्यानंतर गल्फकडे वळलेल्या हिऱ्यांच्या निर्यातीत १२१% वाढ झाली. पेट्रोलियम उपउत्पादनांच्या निर्यातीमध्ये आठपट वाढ झाली, तर काही अभियांत्रिकी वस्तू आणि धातूंमध्ये ५ ते २० पट वाढ झाली होती. मात्र आता ही वाढ आक्रसणार आहे.
