- महेश कोले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दिवाळी म्हटली की सर्वांनाच फराळाची उत्सुकता असते. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आल्याने फराळ बनविण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू झाली आहे. चिवडा, शेव, चकली, विविध लाडू, शंकरपाळे, करंज्या, आदी पदार्थांसाठी लागणाऱ्या किराणा मालाची गृहिणी खरेदी करत आहेत. मात्र, त्याचे - दर वाढल्याने घरगुती फराळाला महागाईचा फटका बसला आहे. बाजारात तयार फराळ मिळत असला तरी, त्याचे दर अधिक असल्याने मध्यमवर्गीयांचा घरीच फराळ बनविण्यावर भर असतो.
तारखेला वसुबारस
१७ ऑक्टोबरला वसुबारस असून, तेव्हापासून दिवाळीला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे अवघे काहीच दिवस उरल्याने गृहिणींची फराळ बनविण्यासाठी लगबग वाढली आहे. बेसन, तांदळाचे पीठ, साखर, पिठीसाखर, साजूक तूप, तेल, भाजणी, सुका मेवा, सुके खोबरे, आदींची खरेदी सुरू आहे. मात्र, बाजारात या जिन्नसांची मागणी वाढल्याने त्यांच्या किमतीही यंदा वाढल्या आहेत.
१०० ते २०० रुपये प्रति किलो वाढले काजूचे दर
सध्या चणाडाळ, जिरे, धणे, तेल आणि काजू यांच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. काजूचे दर १०० ते २०० प्रतिकिलो रुपये असे वाढले आहेत.
तेलाच्या किमतीतही प्रतिलिटरमागे २० ते ३० रुपयांची वाढ झाल्याचे किराणा विक्रेत्यांनी सांगितले. परिणामी, गृहिणींचे दिवाळीचे बजेट कोलमडले आहे.
कमी-जास्त प्रमाणात दर वाढले आहेत. ‘जीएसटी’चा एवढा फरक जाणवत नाही. कंपन्या पॅकेज प्रॉडक्टचे दर समतोल करून बाजारामध्ये आणत आहे.
- धवल सांगोई, किराणा माल विक्रेतेमहागाई दरवर्षी वाढतच आहे. ‘जीएसटी’ कमी झाला, नाही झाला तरी दर तेवढेच आहेत. आम्हाला सण तर साजरे करायचे आहेत. त्यामुळे बाहेरचा महागडा फराळ घेण्यापेक्षा तो घरातच बनवायला नेहमी प्राधान्य देतो.
- वासंती पाचणेकर, गृहिणी