नवी दिल्ली : 'टाटा समूहा'च्या वरिष्ठ स्तरावर मतभेद झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपद देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत अनपेक्षितपणे पुढे ढकलण्यात आला आहे.
टाटा सन्समध्ये ६६ टक्के मालकी असलेल्या 'टाटा ट्रस्ट'ने गेल्या वर्षी चंद्रशेखरन यांना तिसरी टर्म देण्याची शिफारस केली होती. मात्र, मंगळवारी जेव्हा प्रत्यक्ष शिक्कामोर्तब होण्याची वेळ आली, तेव्हा हा निर्णय टळला.
सरकारचीही होती नजर
गेल्या वर्षी टाटा ट्रस्टमध्ये अंतर्गत मतभेद निर्माण झाले होते, तेव्हा केंद्र सरकारनेही यात हस्तक्षेप करत हे वाद सामंजस्याने सोडवण्याचा सल्ला दिला होता. निर्णयाला झालेल्या विलंबामुळे तर्कवितर्काना पेव फुटले आहे.
१८० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या टाटा ग्रुपची टाटा सन्स ही होल्डिंग कंपनी आहे. वाहननिर्मिती, स्टील, माहिती तंत्रज्ञान, विमान वाहतूक आणि नव्या तंत्रज्ञान क्षेत्रांचा त्यामध्ये समावेश आहे.
खटके नेमके कुठे उडाले ?
टाटा समूहाने एअर इंडिया विकत घेतली खरी, पण तिचा तोटा अजूनही सुरूच आहे. यावरून नोएल टाटा यांनी चिंता व्यक्त केल्याचे समजते.
सेमीकंडक्टर आणि बॅटरी निर्मितीसारख्या नवीन क्षेत्रांत टाटा समूह मोठी गुंतवणूक करत आहे. यात असलेला धोका आणि पैशांचा हिशोब यावर प्रश्नचिन्ह आहे.
टाटा सन्सला लिस्टिंग करावे लागणार आहे. या कायदेशीर प्रक्रियेवरूनही संचालक मंडळात मतभेद आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीसाठी काही अटी ठेवल्या आहेत, ज्यावर अद्याप एकमत होऊ शकलेले नाही.
