चंद्रकांत दडस
वरिष्ठ उपसंपादक
नवनव्या स्किम आपल्याला भुरळ घालत असतात. कधी आपल्याला डिस्काउंटची भूरळ पडते तर कधी फुकटात मिळत असलेल्या गोष्टी आकर्षित करतात. रोज नव्या स्किम तयार होतात, गुंतवणुकीचे नवनवे आमिषे दाखविली जातात अन् रोज नवी व्यक्ती सावज ठरते. तुमचे एक चुकीचे क्लिक, चुकीच्या लोकांना दिलेला ओटीपी मेहनतीची कमाई क्षणात गायब करते!
काही वर्षांपूर्वी चोर तुमच्या खिशात हात टाकून चोरी करत असत. मात्र आता खिशात हात न घालता, केवळ एका 'ओटीपी' किंवा 'लिंक'च्या माध्यमातून बँक खाते रिकामे करणारे सायबर चोरटे तुमच्या अवतीभोवती फिरत आहेत. हे चोरटे एक क्लिक, एक ओटीपी किंवा एक चुकीचा फोन कॉलच्या जोरावर तुमची मेहनतीची कमाई क्षणात गायब करत आहेत.
विशेष म्हणजे या संकटाचा फटका केवळ ज्येष्ठ नागरिकांनाच नाही, तर तरुण, सुशिक्षित आणि टेक्नोसॅव्ही लोकांनाही बसतो आहे. त्यातही शिक्षणात, प्रगल्भतेत अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना सायबर गुन्ह्यांचा देशात सर्वाधिक फटका बसत आहे. त्यामुळे या संकटातून बाहेर पडण्यासाठी 'सायबर साक्षर' होणे ही काळाजी गरज बनली आहे. लक्षात ठेवा, या संकटातून बाहेर पडायचे असेल तर ‘सावधगिरी’ हाच खरा पासवर्ड आहे.
फसवणूक कशी होते?
‘फिशिंग’, ‘विशिंग’ (फोनद्वारे फसवणूक), ‘स्मिशिंग’ (एसएमएसद्वारे फसवणूक), बनावट ॲप्स, डिजिटल अरेस्ट, कर्जाच्या नावाखाली होणारी फसवणूक, तसेच सोशल मीडिया अकाउंट हॅक, ऑनलाइन सेक्स्टॉर्शन, सिम स्वॅप, डेबिट/क्रेडिट कार्ड फसवणूक, दुसऱ्याची ओळख वापरून फसवणूक, रॅन्समवेअर या माध्यमातून पैसे उकळण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
गुन्हेगार अधिक स्मार्ट? नेमके काय करतात?
डिजिटल गुन्हेगार आता अधिक ‘स्मार्ट’ झाले आहेत. बँक अधिकारी, पोलिस, आयकर विभाग, ई-कॉमर्स कंपनी किंवा अगदी सरकारी यंत्रणांचे अधिकारी असल्याचे भासवून ते लोकांचा विश्वास संपादन करतात. ‘केवायसी अपडेट’, ‘खाते ब्लॉक होईल’, ‘रिफंड मिळणार’ किंवा ‘तुमच्यावर कायदेशीर कारवाई होणार’ अशा भीतीदायक संदेशांद्वारे नागरिकांना ओटीपी, लिंक किंवा वैयक्तिक माहिती देण्यास भाग पाडले जाते. यूपीआयच्या वाढत्या वापरासोबत ‘कलेक्ट रिक्वेस्ट’ स्वीकारायला लावून पैसे काढून घेण्याचे प्रकारही वाढले आहेत.
काय काळजी घ्यावी?
डिजिटल व्यवहार करताना कोणताही ओटीपी, पिन, पासवर्ड किंवा बँक तपशील कोणालाही देऊ नये.
अनोळखी लिंकवर क्लिक करणे टाळावे.
संशयास्पद कॉल, मेसेज किंवा ई-मेल आल्यास तत्काळ बँक किंवा अधिकृत हेल्पलाइनशी संपर्क साधावा.
फसवणूक झाल्यास दोन तासांच्या आत तक्रार करा.
कोणत्याही अनधिकृत ॲपद्वारे गुंतवणुकीचे व्यवहार करू नका.
अनोळखी नंबरवरून येणारे व्हिडीओ कॉल उचलू नका.
तक्रार करायची तर काय करावे?
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तत्काळ १९३० या हेल्पलाईन क्रमाकांवर तक्रार करा. फसवणुकीनंतरचे दोन ते तीन तास हे गोल्डन अवर असतात. या काळात फसवणूक झालेले पैसे माघारी मिळण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे तक्रार करायला घाबरू नका.
