BSNL 5G : टेलिकॉम क्षेत्रात सध्या रिलायन्स जिओ आणि एअरटेलचे वर्चस्व असले तरी, आता या दोन्ही दिग्गज कंपन्यांच्या कपाळावर चिंतेच्या रेषा उमटायला लागल्या आहेत. याचे कारण आहे, सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलची ५जी एन्ट्री! देशातील दोन प्रमुख महानगरे, मुंबई आणि दिल्ली येथून बीएसएनएल लवकरच ५जी सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. जर बीएसएनएल आक्रमकपणे बाजारात उतरले, तर खाजगी कंपन्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे, ज्यामुळे जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांमध्ये घट होऊ शकते.
स्वस्त ५जी प्लॅनची अपेक्षा
जानकारांचे मत आहे की, बीएसएनएलचे ५जी प्लॅन जिओ आणि एअरटेलच्या तुलनेत अत्यंत स्वस्त असू शकतात. त्यामुळे ज्या ग्राहकांना कमी दरात हाय-स्पीड डेटा हवा आहे, ते ग्राहक जिओ आणि एअरटेलला सोडून बीएसएनएलकडे वळू शकतात. याचा थेट परिणाम दोन्ही खाजगी कंपन्यांच्या कमाईवर दिसून येईल.
डिसेंबरपासून मुंबई-दिल्लीत ५जी ची सुरुवात
बीएसएनएलने ५जी सेवेसाठी आवश्यक असलेले सर्व तांत्रिक परीक्षण, डिव्हाईस इन्स्टॉलेशन आणि टेस्टिंग पूर्ण केली असून ती पूर्णपणे यशस्वी झाली आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनुसार, मुंबई आणि दिल्लीमध्ये डिसेंबर महिन्यापासून ५जी सेवा सुरू केली जाऊ शकते. बीएसएनएलने नुकतेच देशभरात ९५,००० हून अधिक मोबाईल टॉवर लावले आहेत. कंपनीने आधीच सांगितले होते की हे टॉवर्स ४जी सोबतच ५जी नेटवर्क देण्यासाठी देखील सक्षम असतील. मुंबई आणि दिल्लीमध्ये यशस्वी लॉन्चिंगनंतर देशातील लहान-मोठ्या शहरांमध्ये ५जी सेवा सुरू करण्याचा कंपनीचा मानस आहे.
९ कोटींहून अधिक युजर्सना 'गुड न्यूज'
सध्या देशभरात बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या ९ कोटींहून अधिक आहे. ५जी लॉन्चची बातमी या कोट्यवधी युजर्ससाठी खूप दिलासादायक आहे. जरी सेवा सुरुवातीला मुंबई आणि दिल्लीत सुरू होणार असली तरी, भविष्यात आपल्यालाही जिओ-एअरटेलप्रमाणे हाय-स्पीड ५जी सेवा मिळणार, या विश्वासाने ग्राहकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
खाजगी कंपन्यांना मोठी टक्कर
बीएसएनएल ५जी मध्ये उतरल्याने खासगी कंपन्यांना तगडी स्पर्धा मिळेल. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, दिल्ली आणि मुंबईतील लॉन्चिंग केवळ 'टेस्टिंग'सारखे असेल. जेव्हा बीएसएनएल देशभरात ५जी सुरू करेल, तेव्हा त्याचा मोठा फायदा कंपनीला मिळेल. एवढेच नाही, तर बीएसएनएलची तयारी केवळ ५जी पर्यंत मर्यादित नाही. पुढील वर्षी ६जी नेटवर्कची तयारी सुरू होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, बीएसएनएल ६जी नेटवर्कसाठी देखील एक प्रमुख स्पर्धक म्हणून उभा राहू शकतो.
वाचा - पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
२५,००० कोटी रुपयांची स्वदेशी गुंतवणूक
बीएसएनएलला पुन्हा उभारी देण्यासाठी सरकारने खूप प्रयत्न केले आहेत. कंपनीला विकण्याचा विचार सोडून, सरकारने तिला पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने पुढे नेण्याचा निर्णय घेतला. यासाठी बीएसएनएलने TCS, Tejas Networks आणि C-DoT सोबत *२५,००० कोटींहून अधिकचा मोठा करार केला आहे. या कंपन्यांनी बीएसएनएलसाठी स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केले आहे. पुढील वर्षी मार्चपर्यंत ५जी नेटवर्क पुरवणाऱ्या टॉवर्सची संख्या सव्वा लाखांपर्यंत (१.२५ लाख) पोहोचवण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.
