लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: मे महिन्यात देशात शहरी तसेच ग्रामीण भागात नोकरीच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे देशातील बेरोजगारीचा दर मे महिन्यात घसरून मागील ३२ महिन्यांच्या नीच्चांकी ६.९ टक्क्यांवर आला आहे. एप्रिलमध्ये हा दर ७.७ टक्के इतका होता.
एप्रिलमध्ये देशातील बेरोजगारांची संंख्या ३.६३ कोटी इतकी होती. मे महिन्यात यात घट होऊन ही संख्या ३.१८ कोटीवर आली आहे. महिनाभरात ४४ लाख जणांच्या हाताला काम मिळाले आहे, असे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या (सीएमआयई) अहवालातून समोर आले आहे. भारतीय कंपन्यांमध्ये जनरेटिव्ह एआय टूल्स वापरण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. भारत जागतिक स्तरावर हे टूल्स स्वीकारण्यात आघाडीवर आहे. मे महिन्यात देशात ४२.९५ कोटी जणांकडे रोजगार होता. ग्रामीण भागामध्ये बेरोजगारीत ४८ लाखांची घट झाली असली तरी शहरी भागात ३.३ लाख बेरोजगार वाढले आहेत.
ग्रामीण भारतात बेरोजगारी
दर मे महिन्यात ६.१ टक्क्यांवर आली, जी एप्रिलमध्ये ७.५ टक्के होती. उलट, शहरी भागात ही दर एप्रिलच्या ८.१ टक्क्यांवरून वाढून ८.४ टक्क्यांवर गेली.
पगारवाढीचे प्रमाण किती?
नोकरी बाजारात व्यावसायिक नव्या भूमिकांसाठी कर्मचारी घेत आहेत. ते चांगल्या पगारासाठी वाटाघाटी करत आहेत. मायकेल पेजच्या ताज्या रिपोर्टनुसार, यंदा ६२% व्यावसायिकांनी पगारवाढीसाठी कर्मचाऱ्यांशी वाटाघाटी केल्या. त्यापैकी ३७% यशस्वी झाले.