RBI Big Announcement : डिजिटल युगात वाढत्या सायबर फसवणुकीला लगाम घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने आज एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. बनावट ट्रान्झॅक्शनमुळे नुकसान झालेल्या ग्राहकांना २५ हजार रुपयांपर्यंत भरपाई देण्यासाठी नवीन नियमावली आणण्याची घोषणा आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी केली आहे. दरम्यान, सर्वांचे लक्ष लागून असलेल्या 'रेपो रेट'मध्ये कोणताही बदल न करता तो ५.२५ टक्क्यांवर स्थिर ठेवण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे.
फसवणूक झाली तर आता 'नो टेन्शन'!
डिजिटल पेमेंटमध्ये होणारी फसवणूक रोखण्यासाठी आरबीआयने दोन मोठे निर्णय घेतले आहेत. बनावट व्यवहारांमुळे ग्राहकाचे आर्थिक नुकसान झाल्यास त्यांना २५ हजार रुपयांपर्यंतच्या भरपाईसाठी मदत मिळेल. यासाठी लवकरच एक नियमावली तयार केली जाणार आहे. पेमेंट सुरक्षितता वाढवण्यासाठी आरबीआयने एक 'डिस्कशन पेपर' प्रसिद्ध केला आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त ऑथेंटिकेशन आणि व्यवहारांच्या मर्यादेवर विशेष भर दिला जाणार आहे.
दररोज ८१ कोटी ट्रान्झॅक्शन्स!
आरबीआयचे अधिकारी पी. वासुदेवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात डिजिटल पेमेंटची व्याप्ती प्रचंड वाढली आहे. ३१ जानेवारी २०२६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, देशात दररोज सरासरी ८१ कोटी व्यवहार होत असून त्यांची किंमत ९ लाख कोटी रुपये आहे. भारतात सुरक्षेची स्थिती उत्तम असून दर १,०१,२४२ व्यवहारांमागे केवळ एक फसवणुकीचा प्रकार समोर येतो. प्रत्येक १ लाख रुपयांच्या व्यवहारामागे केवळ १.४० रुपयांचे नुकसान होत आहे.
रेपो रेट ५.२५ टक्क्यांवर 'जैसे थे'
आरबीआयने व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. डिसेंबर २०२५ मध्ये रेपो रेट ५.५% वरून ५.२५% करण्यात आला होता, तोच दर आजही कायम ठेवला आहे. रेपो रेट स्थिर राहिल्याने गृह आणि वाहन कर्जाचे हप्ते तूर्तास वाढणार नाहीत, मात्र त्यात कपातही होणार नाही. मुदत ठेवींवर मिळणारे व्याजदरही सध्याच्या पातळीवर स्थिर राहतील.
वाचा - इंस्टाग्रामवर १० हजार 'व्ह्यूज' मिळाले तर किती पैसे मिळतात? रिल्स स्टार्सच्या कमाईचे 'हे' आहे गुपित!
महागाई आणि विकासाचा अंदाज
भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे सांगत गव्हर्नर मल्होत्रा यांनी महागाईचे सकारात्मक चित्र मांडले आहे. यावर्षीचा किरकोळ महागाई २.१% राहण्याचा अंदाज आहे. एप्रिल-जून २०२६ मध्ये महागाई ४.०% आणि जुलै-सप्टेंबर २०२६ मध्ये ती ४.२% पर्यंत जाण्याची शक्यता आहे. महागाईचा दर हळूहळू सामान्य स्तरावर येत असल्याचा विश्वास आरबीआयने व्यक्त केला आहे.
