RBI Repo Rate : आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपली पतधोरण समितीचा निर्णय जाहीर करणार आहे. दरवेळेप्रमाणे, या वेळीही सर्वात मोठी चर्चा रेपो रेट या एकाच विषयावर होत आहे. कोट्यवधी बँक ग्राहकांसाठी हा केवळ एक तांत्रिक शब्द नसून, ईएमआय कमी-जास्त होण्याची ती गुरुकिल्ली आहे. तुमचे गृह कर्ज महाग होईल की स्वस्त, वाहन कर्जात बचत होईल की बोजा वाढेल, याचा थेट हिशेब याच एका दरावरून ठरतो. पण हा रेपो रेट नेमका काय आहे आणि तो तुमच्या खिशाला इतका जोरदार धक्का का देतो, हे सोप्या भाषेत समजून घेऊया.
रेपो रेट म्हणजे काय?
रेपो रेट म्हणजे असा व्याजदर, ज्या दराने व्यापारी बँका आरबीआयकडून पैसे कर्जाने घेतात. जेव्हा बँकांना पैशांची तातडीची गरज किंवा रोख रकमेची कमतरता जाणवते, तेव्हा त्या सरकारी बॉन्ड गहाण ठेवून आरबीआयकडून कर्ज घेतात. या कर्जावर आरबीआय जे व्याज आकारते, त्यालाच रेपो रेट म्हणतात.
सोप्या भाषेत समीकरण
- बँक = ग्राहक
- आरबीआय = बँकेची बँक
- रेपो रेट = बँकेला RBI कडून मिळणाऱ्या कर्जाचा व्याजदर
- जर आरबीआयने रेपो रेट वाढवला, तर बँकांना कर्ज घेणे महाग होते. जर आरबीआयने हा दर कमी केला, तर बँकांना स्वस्त कर्ज मिळते.
आरबीआय रेपो रेटमध्ये बदल का करते?
आरबीआयचे मुख्य काम देशाच्या अर्थव्यवस्थेत संतुलन राखणे आहे – ज्यामुळे महागाईही जास्त वाढू नये आणि आर्थिक गतिविधीही मंदावू नयेत. हे संतुलन साधण्यासाठी आरबीआय वेळोवेळी रेपो रेटमध्ये बदल करते.
१. महागाई वाढल्यास (मागणी जास्त)
जेव्हा बाजारात जास्त पैसा फिरू लागतो, तेव्हा वस्तूंची मागणी वाढते आणि त्या महाग होतात (महागाई वाढते).
आरबीआय काय करते: आरबीआय रेपो रेट वाढवते.
परिणाम: बँका महाग कर्ज देतात, लोक कमी कर्ज घेतात आणि खर्च कमी होतो. यामुळे महागाई हळूहळू नियंत्रणात येते.
२. अर्थव्यवस्था सुस्त पडल्यास (मागणी कमी)
जेव्हा उद्योगांमध्ये गुंतवणूक कमी होते आणि अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्याची गरज असते.
आरबीआय काय करते : आरबीआय रेपो रेट कमी करते.
परिणाम : बँका कमी व्याजदरात कर्ज घेतात आणि ग्राहकांनाही स्वस्त दरात कर्ज देतात. लोक घर, कार, व्यवसाय कर्ज घेतात, बाजारपेठेत तेजी येते आणि आर्थिक गतिविधी वाढतात.
तुमच्या EMI वर याचा थेट परिणाम का होतो?
रेपो रेटमध्ये झालेल्या बदलाचा थेट परिणाम फ्लोटिंग रेट कर्जांवर होतो. २०१७ नंतर आरबीआयने बँकांना गृह कर्जासह अनेक कर्जे बाह्य बेंचमार्कशी जोडण्याचे निर्देश दिले आहेत आणि यात रेपो रेट सर्वात महत्त्वाचा आहे.
रेपो रेट वाढल्यास: बँकेला कर्ज घेणे महाग होते. बँक तुमच्या कर्जाचे दर वाढवते. यामुळे तुमची ईएमआय वाढते किंवा कर्जाचा कालावधी वाढतो.
रेपो रेट कमी झाल्यास: बँकेचे कर्ज स्वस्त होते. ग्राहकांना कमी व्याजदर द्यावा लागतो. यामुळे तुमची EMI कमी होते आणि कर्ज लवकर संपते.
उदाहरणार्थ: जर तुमच्या ४० लाखांच्या गृह कर्जाचा व्याजदर ०.२५% ने कमी झाला, तर तुमच्या EMI मध्ये ६०० ते ८०० रुपयांपर्यंत कपात होऊ शकते.
बचत योजनांवर अप्रत्यक्ष परिणाम
- रेपो रेटचा परिणाम केवळ कर्जावर होत नाही, तर तुमच्या बचत योजनांवरही अप्रत्यक्षपणे होतो.
- रेपो रेट वाढल्यास: बँका मुदत ठेव आणि आवर्ती ठेव (RD)चे व्याजदर वाढवू शकतात. यामुळे बचत करणे आकर्षक ठरते.
- रेपो रेट घटल्यास: FD/RD चे व्याजदर घटू लागतात. गुंतवणूकदार मार्केटमधील किंवा इतर पर्यायांकडे वळू शकतात.
वाचा - सेबीची अवधूत साठे यांच्यावर सर्वात मोठी कारवाई! ५४६ कोटींची संपत्ती जप्तीचे आदेश, काय आहे प्रकरण?
थोडक्यात, रेपो रेट हा केवळ एक आर्थिक शब्द नाही, तर तुमच्या आर्थिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या दरात होणारा प्रत्येक छोटा बदल तुमच्या EMI, खर्च आणि भविष्यातील नियोजनावर थेट परिणाम करू शकतो. या बदलांवर लक्ष ठेवून तुम्ही योग्य वेळी स्वस्त कर्ज आणि चांगल्या गुंतवणुकीचा फायदा घेऊ शकता.
