New India Co-Op Bank Scam : सध्या ओटीटीवर गाजत असलेला 'लकी भास्कर' चित्रपट तुम्ही पाहायला आहे का? मुंबईतील एका बँकेत भास्कर नावाचा एक साधी बँक कर्मचारी असतो. एक दिवस त्याला पैशांची गरज भासते आणि तो बँकेच्या लॉकमधील पैंशावरच हात मारतो. मात्र, तो लकी असल्याने या प्रकरणात पकडला जात नाही. अशीच एक घटना मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेत घडली आहे. साधा क्लर्क ते जनरल मॅनेजर पोस्टवर पोहचलेल्या हितेश मेहताने तब्बल १२२ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला आहे. ऑक्टोबरमध्ये बँकेतून निवृत्त झालेला हितेश मेहता २०२० पासून २०२४ अखेरपर्यंत बँकेच्या लॉकरमधून पैसे काढत राहिला. पण, बँकेला याचा तपासच नव्हता. आरबीआयने बँकेची प्रत्यक्ष पडताळणी केली नसती तर हा घोटाळा कधीच बाहेर आला नसता. मुंबई पोलिसांनी हितेश मेहता याला अटक केली आहे. या घटनेची इनसाइज स्टोरी फार एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभेल अशीच आहे.
हितेश मेहता यांनी न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेत लिपिक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. अनेक पदोन्नतीनंतर ते जनरल मॅनेरज पदापर्यंत पोहचले. त्यांच्याकडे दादर आणि गोरेगाव शाखेची जबाबदारी होती. खातेप्रमुख असल्याने मेहता बँकेची रोकड हाताळत असत. आरबीआयच्या तपासादरम्यान बँक प्रभादेवी कार्यालयाच्या तिजोरीतून ११२ कोटी रुपये आणि गोरेगाव कार्यालयाच्या तिजोरीतून १० कोटी रुपये गहाळ झाल्याचे आढळून आले.
- कसा झाला घोटाळा?
हितेश मेहता २०२० पासून बँकेच्या लॉकरमधून पैसे गहाळ करत होते. तिजोरीत पैसे ठेवण्याऐवजी ते बाहेर वापरत होते. बँकेचे पैसे आपण नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांना दिल्याचे मेहता यांनी पोलिसांसमोर कबूल केले आहे. कोणतीही शंका येऊ नये म्हणून मेहता रजिस्टरमध्ये रोख नोंदी करत होते, पण पैसे तिजोरीत जात नव्हते.
मुंबईतील प्रभादेवी येथील बँकेच्या कॉर्पोरेट कार्यालयात तिसऱ्या मजल्यावर असलेल्या बँकेच्या मुख्य लॉकरमध्ये आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी ठेवलेल्या रोख रकमेची मोजणी केली असता, एकूण १२२ कोटी रुपये कमी असल्याचे दिसून आले. त्यानंतर आरबीआय पथकाने गोरेगाव शाखेत तपासणी केली असता तिथेही १० कोटी रुपयांची रोकड आढळून आली. निवेदनानुसार, काही तासांनंतर आरबीआय अधिकाऱ्यांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वरच्या मजल्यावर बोलावले आणि सांगितले की तिसऱ्या मजल्यावर असलेल्या बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेली रोकड आणि रजिस्टरमध्ये नोंदवलेली रोकड यामध्ये खूप फरक आहे.
- न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवहारावर आरबीआयचे निर्बंध
हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर आरबीआयने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकच्या केवळ व्यवहारांवर बंदी घातली आहे. बँकेचा परवाना अद्याप रद्द केला नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितले की, अलीकडच्या काळात बँकेने केलेल्या काही अनियमिततेमुळे ग्राहकांच्या सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयने सहकारी बँकेला कोणतीही गुंतवणूक किंवा कर्ज घेऊ नये, असे आदेश दिले आहेत.