कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी पावसाच्या उघडिपीमुळे दिलासा मिळाला असला तरी तुरळक हजेरी होती. धरण क्षेत्रात अजूनही मोठा पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील ६१ पैकी ५ बंधारे दिवसभरात वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. राजाराम बंधाऱ्यातून प्रति सेकंद ३५,९२१ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
राधानगरी धरणातून प्रति सेकंद ३१००, वारणेतून १७३० तर दूधगंगेतून १६०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नद्यांच्या पाण्याच्या पातळीत घट होत आहे. पंचगंगेची पाण्याची पातळीही ३४.११ फुटांपर्यंत खाली आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
कोल्हापुरात गुरुवारी पावसाचा जोर कमी असला तरी अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासां जिल्ह्यात सरासरी १५.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गगनबावडा, भुदरगड, आजरा, चंदगड तालुक्यांतही पाऊस सुरू आहे.
आजऱ्यात सर्वाधिक २६० मात्र धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणीसाठ्यात थोडी वाढ होत आहे. रुई धरणावर ६३.०५, इचलकरंजी ५९.०५, तेरवाड ५३, शिरोळ ४६ आणि नृसिंहवाडीत ४५ फूट पाणी पातळी आहे. राधानगरी धरण ६६ टक्के भरले असून, वारणा धरण ६४ टक्के भरले आहे. नद्यांच्या पातळीत वाढ होत असून, पंचगंगा नदीची पातळी ३५ फुटांपर्यंत पोहोचली आहे.
कुरुंदवाड-शिरढोण पुलावर आले पाणी
कुरुंदवाड : दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असली तरी धरण क्षेत्रात पडणारा पाऊस व धरणांतील पाण्याचा विसर्ग यामुळे पंचगंगा नदी पात्राबाहेर पडली आहे. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी पंचगंगा नदीवरील कुरुंदवाड-शिरढोण पुलावरून पाणी वाहू लागले. पाण्याची पातळी वाढल्यास शुक्रवारी हा मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. दरम्यान पुराच्या पाण्यातून नागरिकांनी धोकादायक प्रवास करू नये.
यासाठी गुरुवारी सायंकाळीच या रस्त्यावर पुलापासून काही अंतरावर बॅरिकेड्स लावली आहेत. नदी काठावरील चाऱ्याचे गवत बुडून नुकसान होणार असल्याने व ओल्या चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने अनेक शेतकरी जीव धोक्यात घालून पाण्यात उतरून चारा कापणी करत आहेत.