सातारा जिल्ह्यात सध्या उन्हाच्या झळा वाढू लागल्यामुळे पिकांना पाण्याची गरज भासू लागली आहे. अशात पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी तलाव, विहिरी, बोअर, नदी अशा स्त्रोतांतून पाणी उपलब्ध करून ते पिकांना देत आहेत.
दरम्यान, सातारा, सांगली जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीला वरदान असणाऱ्या कृष्णा कालव्यात गुरुवारपासून पाण्याचे आवर्तन सुरू झाल्याने शेतकरी समाधानी झाले आहेत.
कृष्णा कालव्यातून सोडलेले आवर्तन रब्बीतील पिकांना उपयुक्त ठरणार आहे. हंगामातील पिकांच्या भरणीच्या वेळेत पाणी आल्याने त्याचा पिकांना फायदा होणार आहे. त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे.
पावसाळ्यातील झाल्याने पर्जन्यमान पूरक झाल्याने कालव्यात तारळी व धोम धरणातून सुटणारे पाणी विनासायास होते. त्यामुळे गेल्या दोन-तीन वर्षांपासून कालव्यात सुटणारी पाण्याची आवर्तने वेळेत असल्याने शेतकरी पिकांची जोपासना करताना फायदा होत आहे.
५० गावांच्या शिवारातून ८६ किलोमीटरचा कालवा
• कराड शहरानजीक कृष्णा नदीवरील खोडशी बंधाऱ्यापासून हा कालवा सुरू होतो.
• सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड, तसेच सांगली जिल्ह्यातील वाळवा, पलूस व तासगाव तालुक्यातील ५० गावांच्या शिवारातून वाहणारा ८६ किलोमीटर लांबीचा हा कालवा आहे.
• कालव्याच्या बाजूस ११ हजार हेक्टर शेतीला पाणी मिळते.
पाण्याचा फायदा शेतीसाठी उपयुक्तच
सध्या सुटलेल्या कालव्यातील पाण्याचा फायदा शेतीसाठी उपयुक्त ठरत आहे. रब्बीतील गहू, हरभरा व ज्वारी पिकाच्या ऐन भरणीवेळी पाणी आल्याने शेतकरी देखील समाधानी आहेत. ऊस व द्राक्ष पिकाला या पाण्याचा उपयोग होणार आहे. पाण्याचे आवर्तन सुरू झाल्याने कालव्यातील पाणी पिकांना देण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.
