मुंबई वगळता कोकणात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांसह नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरील परिसरांना बुधवारी 'ऑरेंज' अलर्ट देण्यात आला आहे तर, मुंबईसह विदर्भातील जिल्ह्यांना 'यलो' अलर्ट आहे.
कोकण किनारपट्टीवर बुधवारी रात्री ८:३० वाजेपर्यंत ४ ते ४.२ मीटरपर्यंतच्या उंच लाटा उसळतील, असा इशारा भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने दिला आहे. लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मंगळवारी सकाळपर्यंत पालघर जिल्ह्यात ८२.२ मि.मी. पाऊस झाला आहे.
रायगड जिल्ह्यात ८२.२, मुंबई शहर जिल्ह्यात ६१.२, ठाणे जिल्ह्यात ५९.३ आणि रत्नागिरी जिल्ह्यात ५०.६ मि.मी. सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी आणि रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदी इशारा पातळीवर असून, याबाबत नागरिकांना दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मंगळवार सकाळपर्यंत सरासरी पाऊस (मि.मी.)
सिंधुदुर्ग - ३९.५
कोल्हापूर - ३५.१
गडचिरोली - ३०.८
पुणे - १९.८
चंद्रपूर - १७.८
सातारा - १६.१