पुणे जिल्ह्याच्या खेड आणि शिरूर तालुक्याला वरदान ठरलेले चासकमान धरणात २४.४७ टक्के पाणीसाठा उरला आहे. पाण्याची पातळी झपाट्याने कमी आहे. यंदा पाऊस लांबला, तर शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. चासकमान धरण खेडसह शिरूर तालुक्याला वरदान ठरले आहे. या पाण्यावर दोन्ही तालुक्यांतील सुमारे ५० हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे.
सध्या धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे ५६० क्युसेकने पाणी खाली सोडले जात आहे. कडक उन्हाळा असल्यामुळे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे. एक तर यावर्षी सूर्य आग ओकत असल्याने शेतकऱ्याची पिके दोन दिवसाला पाण्याला येत आहेत. धरणाकाठच्या गावांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन पाण्याचे काटकसरीचे नियोजन हवे.
धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे पाण्याचे आवर्तन खेड परिसरात व शिरूर तालुक्यात जाते. रब्बी हंगाम, उन्हाळी हंगाम अशी पाण्याची आवर्तने सोडली जात असल्यामुळे शेतकरी या पाण्यावर विविध तरकारी पिके घेत असतात. तसेच धरणातून भीमा नदीपात्रात पाणी सोडले जात असल्यामुळे भीमा नदीकाठावरील अनेक गावांना व शेतकऱ्यांना धरणाच्या पाण्याचा फायदा झाला आहे.
भीमा नदीपात्रावर ८ कोल्हापुरी पद्धतीचे छोटे-मोठे बंधारे आहेत. बंधाऱ्यात धरणातून नदीपात्रात शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्यात येत असल्यामुळे बारमाही पाण्याची पातळी टिकून राहते. शेतकरी उन्हाळी हंगामातही पिके घेतात. अनेक गावांचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. ८.५४ टीएमसी क्षमतेच्या चासकमान धरणात गतवर्षी मे महिन्यात १६ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.
भामा आसखेड धरणात आजअखेर ४८.५१ टक्के अखेर पाणीसाठा शिल्लक असून चार दिवसांपूर्वी धरणातून एक हजार क्युसेकने पाण्याचा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
शेतीपिकांना पाण्याची मोठी गरज निर्माण झाली
• सध्या शेतीपिकांना पाण्याची मोठी गरज निर्माण झाली होती. अनेक भागांमध्ये पाण्याअभावी शेतकरी अडचणीत सापडले होते. ही परिस्थिती लक्षात घेता आमदार बाबाजी काळे यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करून भामा-आसखेड धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली होती.
• १.५ टीएमसी असणाऱ्या कळमोडी धरणात ७७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. एक तर यावर्षी सूर्य आग ओकत असल्याने शेतकऱ्याची पिके दोन दिवसाला पाण्याला येत आहेत. धरणाकाठच्या गावांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.
