सणबूर : वांग-मराठवाडी धरणातून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने कडाक्याच्या उन्हाळ्यात देखील कराड आणि पाटण तालुक्यातील वांग मराठवाडी धरणाच्या लाभक्षेत्रातील ४६ गावांची तहान भागत आहे.
शिवाय केटीवेअरच्या माध्यमातून जागोजागी पाणी अडवल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीलाहीपाणी मिळत असल्याने ऐन उन्हाळ्यात शिवारे हिरवीगार दिसत आहे.
वांग-मराठवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात पाटण आणि कराड तालुक्यांतील गावांचा समावेश आहे. शिवाय सांगली जिल्ह्यातील गावांना या पाण्याचा शेती आणि पिण्यासाठी लाभ होत आहे.
सुरुवातीला पावसाळ्यात महापूर आणि उन्हाळ्यात पाणीटंचाई अशी परिस्थिती या भागात होती. सन १९९५ पासून धरणाच्या कामाला सुरुवात झाली परंतु संकटांच्या मालिकेत अडकलेल्या धरणात पाणी काही केल्या अडत नव्हते.
मात्र धरणग्रस्त संघटनांचा उठाव, मोर्चे आणि आंदोलने यामुळे धरणाच्या आणि धरणग्रस्तांच्या अडचणी सुटत गेल्या. पुनर्वसनाबरोबरच धरणाचा देखील प्रश्न मार्गी लागला.
२०११ पासून या धरणात पाणी अडवण्यास सुरुवात झाली, यामुळे धरणात एक टीएमसी पाणीसाठा होऊ लागला. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने घेतल्या; परंतु त्यांना पाण्यासाठी मात्र बराच काळ प्रतीक्षा करावी लागली.
याबाबतीत लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी अनेकदा आवाज उठवल्यामुळे लाभक्षेत्रात पाणी खळखळू लागले. धरणाचे उर्वरित काम पूर्णत्वास आले आहे.
धरणग्रस्तांचे शेवटच्या टप्प्यातील पुनर्वसन हे धरणाच्या वरील बाजूस सरकून केले आहे. यामध्ये उमरकांचन, मेंढ या गावांचा समावेश आहे व अंशतः बाधित गावातील धरणग्रस्तांचे अद्यापही पुनर्वसन झालेले नाही. उर्वरित कामे चालू आहेत.
पाण्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले
◼️ या पाण्यामुळे हजारो हेक्टर कोरडवाहू जमिनी ओलिताखाली आल्या.
◼️ त्यामुळे येथील लोकांच्या हाताला कायमस्वरुपी रोजगार मिळाला. येथील शेतकऱ्यांची मुलं पुण्या-मुंबईला न जाता शेती करू लागली.
◼️ ऊस, हळद, आले, भाजीपाला, मका, फळबागा, यासह फुलशेती करून तो माल कोकण, पुणे, मुंबई तसेच एक्सपोर्ट देखील करू लागले.
◼️ यातून लाखो रुपये मिळू लागल्याने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले.
वांग-मराठवाडी धरणाचे काम करत असताना ठेकेदार कंपनीला अनेक अडचणी आल्या; मात्र यावर तोडगा काढून, धरणाचे काम चालू ठेवले. यात कृष्णा खोरेच्या अधिकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळाले. धरणाच्या बांधकामाला वाळू मिळत नव्हती. त्यावेळी बाहेरील जिल्ह्यातून जादा पैसे देऊन वाळू आणली आणि काम पूर्णत्वास नेले. यात कंपनीला मोठा तोटा सहन करावा लागला. - संदीप मोरे, प्रकल्प व्यवस्थापक, वांग-मराठवाडी धरण
वांग-मराठवाडी धरणातून दरवर्षी मिळणाऱ्या पाण्यामुळे परिसरातील शेतकरी समाधानी झाले; पण ज्यांच्यामुळे समृद्धी आली ते धरणग्रस्त अजूनही उपेक्षितच राहिले आहे. - जगन्नाथ विभूते, विभागीय सदस्य, पुनर्वसन प्राधिकरण समिती पुणे
अधिक वाचा: पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांना १० टक्के परतावा; फळझाडे, गोठा व घर यासांठी किती रुपये मिळणार?
